रस्ते बनले डम्पिंग यार्ड
By Admin | Updated: September 14, 2014 01:07 IST2014-09-14T01:07:28+5:302014-09-14T01:07:28+5:30
पावसाळी आजाराने नागपूर महापालिकेचा आरोग्य विभाग आधीच त्रस्त असताना, स्वच्छता विभाग आणखी डोकेदुखी वाढवितो आहे. डासांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभाग वस्त्यावस्त्यात फवारणी करीत आहे.

रस्ते बनले डम्पिंग यार्ड
नागपूर : पावसाळी आजाराने नागपूर महापालिकेचा आरोग्य विभाग आधीच त्रस्त असताना, स्वच्छता विभाग आणखी डोकेदुखी वाढवितो आहे. डासांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभाग वस्त्यावस्त्यात फवारणी करीत आहे. घराघरात जाऊन तपासण्या केल्या जात आहेत. मात्र दुसरीकडे कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे या कामावर पाणी फेरल्या जात आहे. शहरातील रस्ते डम्पिंग यार्ड बनले आहेत. रस्त्यावर तीन-चार दिवस कचरा पडून राहतो. पावसामुळे कचरा कुजल्याने दुर्गंधी पसरते. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. रस्त्यावर बनलेले डम्पिंग यार्ड आजाराला आमंत्रण देत आहेत.
शहरातील सर्वच भागात रस्त्यावरील डम्पिंग यार्ड बघायला मिळतात. स्वच्छता विभागाचे कर्मचारी वस्त्यांमधून कचरा गोळा करून एका ठिकाणी कचरा गोळा करतात. नंतर हा कचरा कंटेनरच्या साहाय्याने भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये पाठविला जातो. मात्र सध्या कचरा उचलणारी यंत्रणा तलावाच्या स्वच्छतेच्या कामात व्यस्त असल्यामुळे रस्त्यावरील डम्पिंग यार्डमध्ये कचऱ्याचे ढिगारे वाढले आहे. आठवडाभरापासून शहरात सुरू असलेल्या पावसामुळे साठविलेला कचरा कुजला आहे. त्यातून दुर्गंधी सुटली आहे. रस्त्यावरून ये-जा करताना नाक दाबल्याशिवाय प्रवास करता येत नाही, अशी अवस्था झाली आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. याचा त्रास परिसरात राहणाऱ्या लोकांना होत आहे. कचऱ्यामुळे घराघरात माशा, डास वाढले आहेत. या कचऱ्याची व्हिलेवाट लावावी, दुर्गंधी पसरू नये म्हणून कीटकनाशकाची फवारणी करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.
रामनगर ते रविनगर रस्ता
रामनगर ते रविनगर चौकादरम्यान विलासराव देशमुख महाविद्यालयापुढील मोकळ्या जागेवर कचरा डम्पिंग केला जातो. मोकळ्या जागेला लागूनच एक हॉटेल आहे. बाजूला व्यवसायिक परिसर आहे. पावसाळ्यात कचरा नियमित न उचलल्यास दुर्गंधीमुळे त्रास होतो. कचऱ्यामुळे डास वाढले असल्याच्या व्यावसायिकांच्या तक्रारी आहेत. यशोधरानगरात तर रस्त्याला लागून असलेल्या मोकळ्या प्लॉटवर कचऱ्याचे डम्पिंग करण्यात येते. गेल्या ५ ते ६ दिवसांपासून येथून कचरा उचललाच नसल्याची तक्रार लोकांनी केली. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे लोकांना घरात राहणे कठीण झाले आहे. घराघरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
रहाटे कॉलनी चौकाजवळ
कचऱ्याचे कंटेनर
वर्धा रोडवरील धंतोली परिसरातील गोरक्षणच्या अगदी पुढे परिसरातील कचरा आणून जमा केला जातो. महापालिकेने कचऱ्याचे कंटेनर येथून दुसरीकडे नेण्याऐवजी कचरा नागरिकांना दिसू नये म्हणून टीन शेड लावले आहे. मात्र कचऱ्यापासून सुटलेली दुर्गंधी ते थांबवू शकले नाहीत. रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्याला याचा त्रास सहन करावा लागतो. डम्पिंग यार्डच्या बाजूला काही विक्रेते बसलेले आहेत. चहाची टपरीसुद्धा डम्पिंग यार्डला लागून आहे. बाजूलाच आॅटोस्टॅण्ड आहे. अगदी काही अंतरावर रहाटे कॉलनी ही उच्चभ्रू लोकांची वसाहत आहे. पावसाळ्यात या डम्पिंगमुळे आजूबाजूला वास्तव्यास असणारे सर्वच त्रस्त आहेत.