उपराजधानीला जलप्रदूषणाचा धोका
By Admin | Updated: June 5, 2016 02:56 IST2016-06-05T02:56:15+5:302016-06-05T02:56:15+5:30
उपराजधानी तलावांचे शहर आहे. येथे १३ मोठे तलाव आहेत, शिवाय ते पाण्याचे नैसर्गिक स्रोत आहेत. मात्र आज ते सर्व तलाव प्रदूषणाच्या विळख्यात अडकले असून,

उपराजधानीला जलप्रदूषणाचा धोका
पर्यावरण जीवनाचा आधार : तलावांचे आरोग्य बिघडले
नागपूर : उपराजधानी तलावांचे शहर आहे. येथे १३ मोठे तलाव आहेत, शिवाय ते पाण्याचे नैसर्गिक स्रोत आहेत. मात्र आज ते सर्व तलाव प्रदूषणाच्या विळख्यात अडकले असून, जलप्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे. ‘जल’ हा सुद्धा पर्यावरणाचा प्रमुख घटक आहे. नागपूरपासुन काहीच अंतरावर कन्हान व पेंच नदी आहे, शिवाय पश्चिमेला वर्धा आणि पूर्वेला वैनगंगा आहे. पर्यावरणाचा विचार डोक्यात येताच या प्रमुख नद्यांमधील जलप्रदूषणाचा प्रश्न पुढे उभा ठाकतो. त्यामुळे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने जलप्रदूषण रोखण्याचा संकल्प घेतला पाहिजे. पर्यावरण संरक्षणाचा हाच सर्वात सोपा मार्ग आहे.
पर्यावरण हा जीवनाचा आधार आहे. जैवविविधता मानवाला अन्न, पाणी व निवारा अशा जीवनावश्यक वस्तू पुरविते. जैवविविधतेचा नाश हा पर्यावरणीय परिसंस्थांची उत्पादकता कमी करतो. त्यामुळे जैवविविधतेचे संगोपन करणे आवश्यक आहे. वृक्ष जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. मनुष्यासह विविध सजीवांच्या सुरक्षेसाठी आज वृक्षारोपण ही प्राथमिक गरज आहे. हिरव्यागार झाडांमुळे शहरात चैतन्य निर्माण होते. सध्या देशातील बहुतांश मोठी शहरे वायू प्रदूषणाचा सामना करीत आहे. मात्र त्याचवेळी उपराजधानी वनराईच्या कुशीत आजही सुरक्षित आहे. नागपुरातील वायू प्रदूषणाने अद्यापही धोक्याची सीमा ओलांडलेली नाही. ही नागपूरकरांसाठी नक्कीच समाधानाची बाब आहे. परंतु मागील दशकभरापासून नागपुरातही झपाट्याने औद्योगिकीकरण वाढत आहे. शिवाय शहरीकरणाच्या नावाखाली झाडांची सर्रास कटाई केली जात आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार मागील पाच वर्षांत शहरातील सुमारे तीन हजार झाडांची कत्तल झाली आहे. त्याचा पर्यावरणावर थेट परिणाम होऊ लागला आहे. सध्याची जीवनशैली पर्यावरणाला बाधक ठरत आहे. उत्पादन व उपभोगाच्या पद्घतीमुळे पाणी, हवा व जमिनींचा अनिर्बंध वापर होत आहे. यामुळे अनेक वनस्पती व प्राण्यांच्या प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आले आहे.(प्रतिनिधी)
झाडे तोडू नका!
विकासाच्या नावाखाली झाडांची सर्रास कत्तल केली जात आहे; मात्र हे चुकीचे आहे. वृक्षतोडीमुळे पर्यावरण संतुलन बिघडत आहे. कधी काळी नागपूर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे हिरवेगार शहर होते. परंतु आज शहर केवळ नावापुरते हिरवेगार राहिले आहे. मागील काही वर्षांत हजारो झाडांची कत्तल झाली आहे. याचा पर्यावरणावर थेट परिणाम होत आहे. तरी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नागपूरकरांनी वृक्षतोड न करण्याची शपथ घेण्याची गरज आहे. शहरात कार्बन उत्सर्जन वाढत असल्याने दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. भविष्यातील हा धोका टाळण्याची आम्ही वृक्षतोड थांबवून वृक्षलागवड केली पाहिजे. त्याचवेळी शहरातील जलस्रोतांचे संवर्धन झाले पाहिजे. यासाठी स्थानिक प्रशासनासह नागरिकांनी पुढाकार घ्यावा.
- डॉ. कविता रतन, पर्यावरण तज्ज्ञ.
वायू प्रदूषण वाढते!
उपराजधानीत वायू प्रदूषण वाढत आहे. मात्र देशातील इतर मेट्रो शहरांच्या तुलनेत आजही नागपूर सुरक्षित आहे. नागपूर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे हिरवेगार शहर आहे. त्याचा शहराला प्रचंड फायदा होत आहे. दुसरीकडे आजही शहरातील वाहनांची संख्या आटोक्यात आहे. दिल्ली, मुंबई व कोलकाता शहराच्या तुलनेत नागपुरात वाहनांची संख्या फारच कमी आहे. शिवाय उपराजधानीच्या सभोवताल कारखानेसुद्धा कमी आहेत. सर्वाधिक प्रदूषण वाहने व कारखान्यांमुळे होते. मात्र असे असले तरी भविष्यातील धोका टाळण्यासाठी नागपूरकरांनी आतापासूनच प्रदूषणावर नियंत्रण ठेवले पाहिजे. जलप्रदूषणाबाबतसुद्धा नागपूर सुरक्षित आहे. उपराजधानीला प्रामुख्याने पेंच प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो, शिवाय हा प्रकल्प जंगलात असून पूर्णत: प्रदूषणमुक्त आहे.
-पवन लाभसेटवार,पर्यावरण तज्ज्ञ