इंधन दरवाढीमुळे रिक्षा चालवणे झाले कठीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:07 IST2021-02-15T04:07:57+5:302021-02-15T04:07:57+5:30
- रिक्षाला नाही ग्राहक, नोकरी देणार कोण? - घर चालविण्यास हाताला नाही पैसा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सार्वजनिक ...

इंधन दरवाढीमुळे रिक्षा चालवणे झाले कठीण
- रिक्षाला नाही ग्राहक, नोकरी देणार कोण?
- घर चालविण्यास हाताला नाही पैसा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सार्वजनिक वाहतूक सेवेसह शहराच्या मानवी दळणवळणाचा कणा म्हणून ऑटोचालक ओळखले जातात. म्हणूनच अनेकदा ऑटोचालकांच्या संपामुळे नागरिकांची गैरसोय होत असते आणि त्यांच्या मागण्यांना शासन-प्रशासनाला न्याय देण्याशिवाय पर्याय उरत नाही. हे ऑटोचालक आता आर्थिकदृष्ट्या संकटात आहेत. कोरोना टाळेबंदीत इतर क्षेत्राप्रमाणेच ऑटो व्यावसायिकांचे कंबरडे मोडले. टाळेबंदी उठल्यावरही त्यांच्यावरील आर्थिक संकट संपेनात. पेट्रोलच्या वाढलेल्या दराने त्यांना हैराण करून सोडले आहेत. पेट्रोल-डिझेलचे दर वाढले म्हणून सवारीचे दर वाढविले तर प्रवासी ग्राहक ऐकेनात. ई-रिक्षा कमी शुल्कात पोहोचवून देतो तर ज्यादा शुल्क ऑटोला कशाला द्यायचे, असा सवाल ते करतात. त्यातच कॅब सर्व्हिसने जोर पकडल्याने, पैसा-वेळ आणि शाही सवारी असा पर्याय उपलब्ध झाल्याने नागरिकांचे ऑटोवरील प्रेम ओस पडले आहे. या सगळ्याचा परिणाम ऑटोचालकांच्या रोजंदारीवर झाला आहे. कुटुंब यांनाही आहेत. यांचेही मुले शिक्षण घेतात. त्यांचीही मोठी स्वप्ने आहेत. मात्र, या सर्व संकटात घर चालवायचे कसे, असा सवाल ते उपस्थित करतात. कोरोनामुळे आधीच विविध कंपन्यांत कर्मचारी कपात झाली आणि दररोज होत असल्याचे निदर्शनास येते. मग, ऑटोला पर्याय म्हणून नोकरी कोण देणार? भाजी विक्री हा उत्तम पर्याय. टाळेबंदीत तेही केले; पण आधीच भाजीविक्रीचा व्यवसाय करणारे बरेच आहेत. त्यांची नाराजी ओढवून घेतली. दुसऱ्याच्या व्यवसायात शिरकाव केला तर त्यांच्या रोजगारावर संकट. मग कराचे काय, असे अनेक प्रश्न ऑटोचालकांचे आहेत.
------
पेट्रोलचे दर
१ डिसेंबर - ८९.९२
१ जानेवारी - ९०.३८
१ फेब्रुवारी - ९३.००
१४ फेब्रुवारी - ९५.२०
-------
डिझेलचे दर
१ डिसेंबर - ७९.५२
१ जानेवारी - ७९.३७
१ फेब्रुवारी - ८२.२०
१४ फेब्रुवारी - ८४.७५
------------
नागपूर शहरात रिक्षा
परवानाधारक - १९,५०० (पेट्रोल व डिझेल)
विना परवानाधारक - २५,००० (पेट्रोल व डिझेल)
एलपीजी रिक्षा - ५ टक्के
-------------
आधी दिवसाला ५०० रुपयाचे इंधन टाकत होतो तर त्यावर ३०० किंवा ४०० रुपये कमाई होत होती. आता तेवढ्याच रुपयाच्या इंधनात भागत नाही. आताही दिवसाला कमाई तेवढीच होते. मात्र, इंधनासाठी ज्यादा पैसा मोजावा लागतो. महागाई वाढली आहे. एका अर्थाने घडाईपेक्षा मळाई जास्त झाली आहे.
- खोरेंद्र सोनिक, रामनगर, पांढराबोडी ()
--------
इंधनाच्या गुंतवणुकीत मिळणारी कमाई कमी जास्त होते. मात्र, इंधनाचे दर ज्या तुलनेत वाढत आहेत. त्या तुलनेत कमाई नाही. मुलांच्या शिक्षणाचा खर्च वाढतो आहे. काय हवे, नको ते असतेच. सोबतच आरोग्याचाही विषय असतोच. प्रकृतीचे कधीच सांगता येत नाही. मात्र, उपचार आणि औषधे आज परवडतात का, अशा दिवसभर परिश्रम केल्यावर कमाईचा दुसरा पर्याय निवडायचा कसा आणि निवडलाच तर तो मिळणार का, असा सवाल आहे.
- इस्त्राईल खान, बेसा रोड ()
--------
टाळेबंदीमध्ये ऑटो रस्त्यावर उतरवता आला नाही. त्या काळात पर्याय वेगवेगळे शोधावे लागले. गेला काळ गेला म्हणावा तर आताची स्थिती त्यापेक्षा वेगळी नाही. इंधन दरवाढीमुळे सवारी दर वाढवावे लागत आहेत. मात्र, ग्राहक ते मान्य करायला तयार नाहीत. त्यांचेही चुकत नाही. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, उत्पन्नात घट झाली तर अडचणी त्यांच्याही आहेत. मात्र, इंधनाचे दर तर कमी असायला हवे होते. देवच जाणे.
- मोहन बावणे, बिडीपेठ ()
-----------
कोरोनाने आधीच ऑटोचालकाचा रोजगार मोडकळीस आला आहे. केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून कोणतीच मदत ऑटोचालकांना झाली नाही. त्यातच वारंवार होणारी पेट्रोल /डिझेल दरवाढीमुळे महागाई वाढली आहे. पॅसेंजर पैसे देऊ शकणार नाही व ऑटोचालकांना कमी पैशात परवडणार नाही. त्यामुळे नागपूर शहर व जिल्ह्यातील २५ हजारांच्या वर असलेल्या ऑटोचालक व त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट येणार आहे. केंद्र व राज्य सरकारांनी टॅक्स कमी करावा. असे झाले तर इंधनाचे दर ५० रुपयांपर्यंत होतील. हे नसेल होत तर ऑटोचालकांना रेशनप्रमाणे रेशन कार्डवर सवलतीच्या दरात पेट्रोल दिले पाहिजे.
- चरणदास वानखेडे (महासचिव), नागपूर जिल्हा ऑटोचालक- मालक महासंघ, नागपूर
...............