विरोधकांसह सत्ताधारीही पाण्यासाठी आक्रमक
By Admin | Updated: May 21, 2014 00:59 IST2014-05-21T00:59:19+5:302014-05-21T00:59:19+5:30
नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा करण्याबाबत महापालिकेच्या दाव्याची मंगळवारी नगरसेवकांनी सभागृहात हवा काढली. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांसह सत्ताधारी

विरोधकांसह सत्ताधारीही पाण्यासाठी आक्रमक
नागपूर : नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा करण्याबाबत महापालिकेच्या दाव्याची मंगळवारी नगरसेवकांनी सभागृहात हवा काढली. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांसह सत्ताधारी नगरसेवकांनीही आक्रमक भूमिका घेतली. प्रभागांमध्ये होत असलेला अनियमित पाणीपुरवठा, यामुळे नागरिकांना होणारा त्रास व नगरसेवकांवर ओढवणारी नाराजी महापौरांसमोर मांडण्यात आली. सुमारे दोन तास पाणी प्रश्नावर वादळी चर्चा झाली. मुस्लिम लीगचे असलम खान यांनी सांगितले की, १४ एप्रिल रोजी महेंद्रनगर जलकुंभावरून १० टँकर बंद करण्यात आले. तोडफोड केली म्हणून एका टँकर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. टँकर बंद केल्यामुळे पाणीपुरवठ्यात अडथळा निर्माण झाला आहे. नगरसेवकांनी या विरोधात आवज उठविला तर ओसीडब्ल्यू पोलिसात तक्रार दाखल करते. एका जलकुंभावरून टँकरच्या २० स्लीप निघतात. प्रत्यक्षात दोनच टँकर नागरिकांपर्यंत पोहचतात, असा आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादीचे दुनेश्वर पेठे म्हणाले, बाबुळबन येथे जलकुंभाचे काम सुरू होऊ शकले नाही. यावर आयुक्त श्याम वर्धने यांनी नागरिक व आमदाराच्या विरोधामुळे काम सुरू झाले नसल्याचे स्पष्ट केले. आता सर्व अडथळे दूर झाले असून आठ दिवसात स्थायी समितीसमोर प्रस्ताव येणार असल्याचे त्यांनी सांगितले. हरीश डिकोंडवार यांनी नंदनवन भागात पाणी समस्या असल्याचे सांगितले. कामिल अन्सारी यांनीही पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्याची मागणी केली. सत्तापक्षनेते प्रवीण दटके यांनी जलप्रदाय विभाग जबाबदारीपासून दूर पळत असल्याचा आक्षेप घेतला. २५ लाख लोकसंख्या, ५० ते ६० जलकुंभांना फक्त १२ ते १५ अधिकार्यांच्या भरवशावर सोडता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले. काँग्रेसचे नगरसेवक दीपक कापसे म्हणाले, सक्करदरा येथील पाण्याची टाकी भरत नाही. त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. म्हाळगीनगर जलकुंभातून अर्ध्या प्रभागाला पाणीपुरवठा होतो. येथूनन सध्या दिवसाआड पाणी दिले जाते. वीज ट्रीप झाली तर जलकुंभ भरत नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना दोन दोन दिवस पाणी मिळत नाही. (प्रतिनिधी)