गजराज प्रकल्पाची जमीन शेतकऱ्यांना परत करा
By Admin | Updated: November 16, 2015 03:13 IST2015-11-16T03:13:40+5:302015-11-16T03:13:40+5:30
गजराज प्रकल्पासाठी शेतकऱ्यांकडून संपादित करण्यात आलेल्या जमिनीवर २१ वर्षांपासून कोणतेही निर्माण कार्य करण्यात न आल्यामुळे..

गजराज प्रकल्पाची जमीन शेतकऱ्यांना परत करा
जमिनीवर कोणतेही निर्माणकार्य नाही
नागपूर : गजराज प्रकल्पासाठी शेतकऱ्यांकडून संपादित करण्यात आलेल्या जमिनीवर २१ वर्षांपासून कोणतेही निर्माण कार्य करण्यात न आल्यामुळे ही जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी गजराज प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश चौधरी यांनी केली आहे.
शिवणगाव येथील १२० शेतकऱ्यांची ३६३ एकर शेतजमीन १९९३ मध्ये संरक्षण विभागाने वायूसेनेच्या गजराज प्रकल्पासाठी एक लाख पाच हजार रुपये प्रति एकर भावाने संपादन केली आहे. जमीन संपादित करताना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी, असे आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात आजपर्यंत कोणतेही आश्वासन पूर्ण करण्यात आलेले नाही. या संदर्भात माहितीच्या अधिकारात माहिती प्राप्त केली असता त्यांना वायुसेनेच्या अलाहाबाद येथील मध्य वायू कमांड मुख्यालयाकडून असे सांगण्यात आले की, संपूर्ण जमीन २ सप्टेंबर १९९७ रोजी ताब्यात घेतली. गजराज प्रकल्प रद्द झालेला नसून त्याबाबत विविध टप्प्यात विकास कार्ये सुरू आहेत. प्रत्यक्षात येथील जागेवर अद्याप कोणतेही निर्माण कार्य सुरू करण्यात आले नाही. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांजवळ जमीन नाही आणि रोजगारही नाही. त्यांची आर्थिक स्थिती अतिशय दयनीय झालेली आहे. कायद्यानुसार ही जमीन परत करण्यात यावी, अशी मागणी चौधरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)