परत...तारीख पे तारीख
By Admin | Updated: June 24, 2014 00:51 IST2014-06-24T00:51:07+5:302014-06-24T00:51:07+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने प्रवेशबंदी लावलेल्या ६३ महाविद्यालयांतील ६,६१६ विद्यार्थ्यांच्या विशेष परीक्षेच्या मुद्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी सोमवारी बोलविण्यात आलेली

परत...तारीख पे तारीख
नागपूर विद्यापीठ : विद्वत परिषदेची बैठक स्थगित
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने प्रवेशबंदी लावलेल्या ६३ महाविद्यालयांतील ६,६१६ विद्यार्थ्यांच्या विशेष परीक्षेच्या मुद्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी सोमवारी बोलविण्यात आलेली विद्वत परिषदेची तातडीची बैठक स्थगित करावी लागली. विशेष परीक्षेचे आयोजन केल्यास महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याचे कशाप्रकारे उल्लंघन होऊ शकते अशी भूमिका घेऊन काही सदस्यांनी परीक्षेला आक्षेप घेतला. परंतु अधिकाऱ्यांचा जर परीक्षेला आक्षेप होता व नियमांचे उल्लंघन होऊ शकते याची माहिती होती तर मग विद्वत परिषदेची तातडीची बैठक बोलविण्यातच का आली असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
प्रवेशबंदी असतानादेखील ६३ महाविद्यालयांनी ६,६१६ विद्यार्थ्यांना नियमबाह्य पद्धतीने प्रवेश दिले. या विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्यात यावी असे निर्देश राज्य शासनातर्फे देण्यात आले आहे. यासंबंधात कार्यक्रमपत्रिकेत विषद केल्याप्रमाणे विद्वत परिषदेच्या बैठकीत चर्चा सुरू झाली. विद्वत परिषदेचे सदस्य डॉ.कीर्तीवर्धन दीक्षित यांनी सर्वात प्रथम ‘नोट आॅफ डिसेन्ट’ सादर केली. प्रवेशबंदीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना यासंदर्भात निर्देश देण्याचे राज्य शासनाला अधिकारच नाही. महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ चे कलम ८(४) अन्वये जारी करण्यात आलेला हा आदेश पुनर्विचारासाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली.
यानंतर विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक विलास रामटेके यांनी महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियमानुसार विशेष परीक्षेची तरतूदच नाही. त्यामुळे जर राज्य शासनाच्या निर्देशांनुसार अशी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला तर ते नियमांचे उल्लंघन ठरेल. यामुळे विद्यापीठाच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे असे म्हणत विशेष परीक्षा घेण्यास विरोध केला.
अखेर संबंधित आक्षेपांवर विचार करून यासंदर्भात भूमिका ठरविण्यासाठी विद्वत परिषदेची बैठक २६ जूनपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
२६ जून रोजी ही बैठक पुढे घेण्यात येईल. दरम्यान राज्य शासनाने दिलेला आदेश व सोमवारी विद्वत परिषदेच्या बैठकीचा वृत्तांत न्यायालयासमोर मांडण्यात येईल असे प्र-कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे यांनी स्पष्ट केले.
विद्यापीठाची ‘तळ्यात-मळ्यात’ भूमिका
दरम्यान, राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव आर.जी. जाधव यांनी १९ जून २०१४ रोजी विद्यापीठाला पत्र पाठवून प्रवेशबंदी महाविद्यालयातील अनधिकृत प्रवेशित विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचे आदेश दिले. वास्तविक पाहता कलम ८/४ अन्वये आदेश काढताना राज्य शासनाने विद्यापीठाकडे यासंदर्भात विचारणा केली होती. त्यावेळी विशेष परीक्षा घेण्यास विद्यापीठाने अनुकूलता दर्शविली नव्हती. परंतु राज्य शासनाच्या निर्देशानंतर मात्र विद्यापीठाची भूमिका बदलली असून, आता विद्यापीठ विशेष परीक्षा घेण्याच्या विचारात असल्याची माहिती विद्यापीठातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर दिली. विद्यापीठाच्या ‘तळ्यात-मळ्यात’ भूमिकेमागे नेमके कारण काय, यासंदर्भात बोलण्यास प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी नकार दिला.
कार्यक्रम पत्रिकेवर आक्षेप
विद्वत् परिषदेच्या कार्यक्रम पत्रिकेतील त्रुटींवर काही सदस्यांनी बैठकीनंतर बोट ठेवले.
शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या आदेशाचे अनुपालन करून पुढील प्रवेशासंबंधी योजना आखण्यासंदर्भात विचार करणे असे कार्यक्रम पत्रिकेतील बाब क्रमांक १ मध्ये नमूद करण्यात आले आहे. याचाच अर्थ विद्यार्थ्यांच्या विशेष परीक्षेला विद्यापीठाची मान्यता असून, नियमबाह्य पद्धतीने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या द्वितीय वर्षातील प्रवेश लवकरात लवकर करण्याबद्दल पावले उचलण्यात येत आहेत असा होतो का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर बीसीयूडी संचालक डॉ. कोमावार हे समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही.(प्रतिनिधी)
विद्यापीठात ‘कम्युनिकेशन गॅप’
दरम्यान, या बैठकीच्या अगोदर विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांची विशेष परीक्षेसंदर्भात चर्चा झाली होती. परंतु विद्वत् परिषदेच्या बैठकीत परीक्षा नियंत्रकांनी आक्षेप नोंदविल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विशेष परीक्षा घेतली तर विद्यापीठ अधिनियमांचे उल्लंघन होऊ शकते, याची माहिती कुलगुरू, प्र-कुलगुरू, बीसीयूडी संचालक यांना नव्हती का? परीक्षा नियंत्रकांना यासंदर्भात विश्वासात घेण्यात आले होते का? विद्यापीठाने बैठकीअगोदर सखोल अभ्यास केला नाही का? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांमध्ये ‘कम्युनिकेशन गॅप’ असल्याची बाब यानिमित्ताने समोर आली आहे. प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी मात्र याला नकार दिला. परीक्षा नियंत्रक अगोदर झालेल्या चर्चेत उपस्थित होते. त्यांनी त्यावेळी जरी हे मुद्दे मांडले नसले तरी अभ्यासानंतर त्यांना काही गोष्टी निदर्शनास आल्या असतील. त्याच त्यांनी सोमवारच्या बैठकीत मांडल्या असतील, असे प्र-कुलगुरू म्हणाले.