बळकट चळवळीसाठी रिपब्लिकन पक्षाची गरज
By Admin | Updated: June 24, 2014 01:00 IST2014-06-24T01:00:56+5:302014-06-24T01:00:56+5:30
रिपब्लिकन पक्ष केवळ राजकीय पार्टी नव्हे तर ती एक चळवळ आहे. आंबेडकरी विचारांवर चालणारी ही चळवळ दलित, शोषित आदिवासींसह सामान्य जनांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिली आहे.

बळकट चळवळीसाठी रिपब्लिकन पक्षाची गरज
नागपूर : रिपब्लिकन पक्ष केवळ राजकीय पार्टी नव्हे तर ती एक चळवळ आहे. आंबेडकरी विचारांवर चालणारी ही चळवळ दलित, शोषित आदिवासींसह सामान्य जनांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिली आहे. केवळ सत्ता मिळविणे हे पक्षाचे उद्दिष्ट नसून लोकांचे प्रश्न सोडविणे हा विचार घेऊन रिपब्लिकन पक्ष कार्यरत राहिला आहे. परंतु सध्या पक्षाची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. चळवळीवरसुद्धा त्याचा परिणाम दिसून येत आहे, तेव्हा आंबेडकरी चळवळीला गतिमान करायचे असेल तर रिपब्लिकन पक्ष बळकट करावाच लागेल, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे (खोरिपा) राष्ट्रीय अध्यक्ष उपेंद्र शेंडे यांनी केले.
रिपब्लिकन पक्ष खोरिपातर्फे हिंदी मोरभवन येथे पूर्व विदर्भीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद गजबे होते. सी.एम. वंजारी, उत्तमराव गवई, पुरुषोत्तम शेंडे, रामलाल सोमकुंवर, अॅड. डी.के. वानखेडे, प्राचार्य सत्यपाल काटकर, अॅड. यु.जी. कराडे, डॉ. शिवशंकर बनकर, चंद्रकांत वाघमारे, डॉ. रवी जांभुळकर आदी प्रमुख पाहुणे होते.
उपेंद्र शेंडे पुढे म्हणाले, रिपब्लिकन पक्षाला बळकट करावेच लागेल. त्यादृष्टीने पक्ष विदर्भाच्या गावखेड्यात पोहचला पाहिजे. रिपब्लिकन पक्षाला पूर्वीचे गतवैभव आपल्याला मिळवून द्यायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उत्तमराव गवई, पुरुषोत्तम शेंडे, प्राचार्य सत्यपाल काटकर, अॅड. डी.के. वानखेडे यांनीही मार्गदर्शन केले.
खोरिपचे सरचिटणीस नितीन साखरे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला शिशुपाल टिपले, डी.डी. बन्सोड, दादाराव अंबादे, नाना धनविजय, महिपाल ढवळे, अरुण कोटांगळे, माया राऊत, पूनम टेंभुर्णीकर, सुनील वासनिक आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)