रिपब्लिकन पक्षाची पुनर्बांधणी व्हावी
By Admin | Updated: June 23, 2014 01:24 IST2014-06-23T01:24:29+5:302014-06-23T01:24:29+5:30
सध्याची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. दलित, शोषित, आदिवासींना जगणे कठीण झाले आहे. आंबेडकरी चळवळसुद्धा संक्रमणावस्थेत आहे. प्रस्थापित राजकीय पक्ष हे भांडवलदार व उद्योगपती

रिपब्लिकन पक्षाची पुनर्बांधणी व्हावी
खोरिपची अपरिहार्य सभा : बागडे यांचे प्रतिपादन
नागपूर : सध्याची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. दलित, शोषित, आदिवासींना जगणे कठीण झाले आहे. आंबेडकरी चळवळसुद्धा संक्रमणावस्थेत आहे. प्रस्थापित राजकीय पक्ष हे भांडवलदार व उद्योगपती धार्जिणे आहेत, तेव्हा देशातील दलित, शोषित आदिवासांना न्याय मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाची पुन्हा एकदा पुनर्बांधणी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे (खोरिपा) अध्यक्ष अॅड. वासुदेवराव बागडे यांनी येथे केले.
खोरिपातर्फे हिंदी मोरभवन येथे पक्षाची अपरिहार्य सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. खोरिपाचे प्रदेशाध्यक्ष सयाजीराव वाघमारे, बनारस हिंदू विद्यापीठाचे प्रा. डॉ. प्रमोद बागडे, जी. दीपक महेशराम, बाळू खोब्रागडे, देशक खोब्रागडे, द्रोपदाबाई रामटेके प्रमुख वक्ते होते.
अॅड. वासुदेवराव बागडे म्हणाले, हजारो वर्षांपासूनच्या ज्या जातीय शक्तीने या देशावर अधिकार गाजवले आहे त्या शक्ती आजही अस्तित्वात आहेत. गेल्या काही वर्षांपासून दलित, आदिवासींवरील अत्याचारात वाढ झाली आहे. दलित आदिवासी एकसंघ नसल्याचे हे द्योतक आहे. रिपब्लिकन पाटी ही या देशातील शेतकरी, मजूर व सर्वसामान्यांसाठी लढा देणारी पहिली राजकीय पार्टी होती. भूमिहिनांचा लढा हा देशातील ऐतिहासिक लढ्यांपैकी एक मानला जातो. रिपब्लिकन पक्षाच्या एका हाकेवर लाखो लोक तेव्हा रस्त्यावर उतरले होते. रिपाइंची ती ताकद पुन्हा निर्माण करण्यासाठी पक्षाची पुनर्बांधणी व्हावी. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्यक्रम निश्चित करावा, असे आवाहन त्यांनी केले. सयाजीराव वाघमारे यांनी रिपाइं नेत्यांना राजकारण सोडून सरकारच्या विरोधात आवाज बुलंद करण्याचे आवाहन केले. डॉ. प्रमोद बागडे यांनी बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाचा वारसा पुढे चालवण्यासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही, असे मत व्यक्त केले.
खोरिपचे सरचिटणीस प्रा. डॉ. प्रदीप बोरकर यांनी प्रास्ताविक केले. जी. वासुदेवन यांनी संचालन केले. पांडुरंग बोरकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)