दीड कोटीचे अपघात दावे निकाली
By Admin | Updated: June 14, 2015 03:14 IST2015-06-14T03:14:10+5:302015-06-14T03:14:10+5:30
विषयनिहाय राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये शनिवारी १ कोटी ४० लाख ८७ हजार ४३७ रुपयांचे मोटार अपघात दावे तडजोडीतून निकाली काढण्यात आले.

दीड कोटीचे अपघात दावे निकाली
नागपूर : विषयनिहाय राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये शनिवारी १ कोटी ४० लाख ८७ हजार ४३७ रुपयांचे मोटार अपघात दावे तडजोडीतून निकाली काढण्यात आले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने शनिवारी जिल्हा न्यायालयात या अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे म्हणाले की, राष्ट्रीय लोक अदालत ही प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करणारी सर्वाधिक प्रभावी न्यायिक यंत्रणा आहे.
या अदालतीत मोटार अपघात दाव्यांची प्रलंबित असलेली ८८ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ७८ प्रकरणे निकाली निघालीत. प्रकरणाच्या निपटाऱ्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी सचिव एस. एच. ग्वालानी यांनी न्यायाधीश, वकील आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश असलेले दोन पॅनल तयार केले होते.
या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रुपालीविरुद्ध मधुकर आणि न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी हे प्रकरण समझोता होऊन निकाली निघाले. एकूण ३० लाखांचे हे प्रकरण १८ लाखात निपटले. अपघातात वडिलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर निराश्रित झालेल्या एका १५ वर्षांच्या मुलीला तडजोडीनंतर ७ लाख ६० हजाराचा दावा मंजूर करण्यात आला.
न्यायाधीश एम. एस. आझमी आणि ए. व्ही. दीक्षित यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. न्यायिक अधिकारी डी. पी. वायकर, व्ही. सी. बरडे, एम. टी. असिम, एस. एच. ग्वालानी आणि एस. बी. गावंडे यांनी या लोक अदालतीचे उत्कृष्ट आयोजन केले होते. (प्रतिनिधी)