मोवाडसह १३ गावांतील पूरग्रस्तांना दिलासा
By Admin | Updated: August 14, 2014 01:20 IST2014-08-14T01:20:04+5:302014-08-14T01:20:04+5:30
वर्धा नदीला १९९१ मध्ये आलेल्या पुरामुळे मोवाडसह १३ गावांचे अतोनात नुकसान झाले. या पूरग्रस्तांना घरे बांधणीसाठी शासनाने दिलेले कर्ज आणि त्यावरील व्याज असे एकूण १४ कोटी ७५ लाख

मोवाडसह १३ गावांतील पूरग्रस्तांना दिलासा
अनिल देशमुख : घरावरील कर्ज आणि व्याज माफ, मंत्रिमंडळाचा निर्णय
नागपूर : वर्धा नदीला १९९१ मध्ये आलेल्या पुरामुळे मोवाडसह १३ गावांचे अतोनात नुकसान झाले. या पूरग्रस्तांना घरे बांधणीसाठी शासनाने दिलेले कर्ज आणि त्यावरील व्याज असे एकूण १४ कोटी ७५ लाख रुपये राज्य शासनाने माफ केले, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख देशमुख यांनी दिली. याबाबत मंत्रिमंडळापुढे ठेवलेला प्रस्ताव मान्य करण्यात आला. यामुळे मोवाड भागातील नागरिकांना दिलासा मिळाला.
वर्धा नदीला ३० जुलै १९९१ रोजी आलेल्या महापुरात मोवाड वाहून गेले. तर नरखेड तालुक्यातील इतर १३ गावे बाधित झाली. महापुरात २०४ नागरिकांना जलसमाधी मिळाली तर जनावरे वाहून गेली. घरांचे नुकसान झाले, नागरी सुविधा, शासकीय इमारतीचे नुकसान, व्यापारी, कारागिरांचे नुकसान तसेच शेतपिकांचेही प्रचंड नुकसान झाले. पूरग्रस्तांना तातडीची आर्थिक मदत, अस्थायी निवारा व बाधित गावांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने तत्कालीन तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली २१ आॅगस्ट १९९१ रोजी नागपूर येथे बैठक घेण्यात आली. त्यात या विषयावर आराखडा, कृतीपर कार्यक्रम आणि निर्णय घेण्यात आले. त्यानुसार पूरग्रस्तांचे पुनर्वसन, बाधित पूरग्रस्त गावाचे सुरक्षितस्थळी पुनर्वसन करण्यात आले.
या पुनर्वसनाच्या ठिकाणी घरे, घरकुलाच्या बांधकामासह नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. पुनर्वसनाच्या ठिकाणी शेतकरी कुटुंबाकरिता तीन हजार चौरस फूट जागेसह २५ हजार रुपये खर्चाची घरे बांधून देण्यात आली. यात १० हजार रुपये शासकीय अनुदान, १० हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून तर पाच हजार रुपये कर्ज अशाप्रकारच्या खर्चातून ती घरकुले पूर्ण करण्यात आली. यासाठी शासनाचा काही निधी आणि काही कर्जपुरवठा करण्यात आला.
पूरबाधित गावांचे पुनर्वसन झाले, त्या गावांमध्ये पुरेसा रोजगार नसल्याने आर्थिक स्थिती हलाखीची आहे. त्यामुळे कर्ज आणि त्यावरील व्याजाची परतफेड होणे अशक्य होते. परिणामी कर्ज आणि व्याज माफ करण्याची मागणी ना. देशमुख यांनी शासनाकडे वारंवार केली होती. मुख्यमंत्र्यांसमोरही हा विषय ठेवला होता.
सदर कर्ज वसूल करणे शक्य नसल्याने मुद्दल रक्कम आणि त्यावरील व्याज माफ करण्याचा प्रस्ताव ना. देशमुख यांनी मंत्रिमंडळासमोर ठेवला. तो प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य करण्यात आला. त्यानुसार आता मोवाडसह इतर पुनर्वसित १३ गावातील नागरिकांवरील घरबांधणीचे कर्ज आणि त्यावरील व्याज पूर्णपणे माफ करण्यात आले. या निर्णयामुळे पूरग्रस्तांना दिलासा मिळाला. (प्रतिनिधी)