मर्जीतील अभियंत्यांसाठी सोयीचे रस्ते
By Admin | Updated: June 24, 2014 00:53 IST2014-06-24T00:53:34+5:302014-06-24T00:53:34+5:30
सार्वजनिक बांधकाम खात्यात मर्जीतील अभियंत्यांसाठी त्यांच्या सोयीचे प्रशासकीय मार्ग निर्माण केले गेले आहेत. हे सर्व मार्ग व्हाया नाशिक जात असून या मार्गांवर ‘टोल’ नाकेही लावण्यात आले आहेत.

मर्जीतील अभियंत्यांसाठी सोयीचे रस्ते
व्हाया नाशिक : सार्वजनिक बांधकाम खात्यात टोल-फ्री काहीच नाही
राजेश निस्ताने - यवतमाळ
सार्वजनिक बांधकाम खात्यात मर्जीतील अभियंत्यांसाठी त्यांच्या सोयीचे प्रशासकीय मार्ग निर्माण केले गेले आहेत. हे सर्व मार्ग व्हाया नाशिक जात असून या मार्गांवर ‘टोल’ नाकेही लावण्यात आले आहेत.
या खात्यात सचिवापासून ते कनिष्ठ अभियंत्यापर्यंतच्या नियुक्त्या वादग्रस्त ठरल्या आहेत. गेली अडीच वर्ष सचिवपदी व्ही.आर. नाईक की प्रदीप गणवीर हा वाद सुरू होता. न्यायालयीन निर्णयाचा आडोसा आणि ‘दादां’च्या आशीर्वादाने अखेर नाईकांनी बाजी मारली. परंतु गणवीरांनी अद्याप न्यायालयाचा मार्ग न सोडल्याने पुन्हा फेरबदलाची शक्यता नाकारता येत नाही.
मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता या प्रमुख रिक्त पदांवरील नियुक्त्यांचाही बोजवारा उडाला आहे. ही पदे अधिकाधिक काळ रिक्त रहावी, त्यांचा अतिरिक्त प्रभार दिला जावा, यातच बांधकाम खात्याचा अधिक ‘इन्टरेस्ट’ दिसून येतो.
त्यामुळेच वर्षानुवर्षे हेतुपुरस्सर बढत्या, बदल्यांच्या फाईली थांबविणे, त्यात तांत्रिक त्रुट्या निर्माण करणे असा कारभार सुरू आहे. त्यामुळेच अनेक अभियंते सेवानिवृत्त झाले पण त्यांना बढती मिळू शकली नाही. कौटुंबिक अडचणी असूनही विनंतीनुसार बदल्या मिळत नाहीत. महाराष्ट्रात सर्वत्र सारखीच स्थिती आहे. मर्जीतील अभियंत्यांना मात्र पाहिजे तेथे दुहेरी प्रभाराचे मार्ग उपलब्ध करून दिले जात आहेत. एकीकडे दोन ते तीन प्रभार तर दुसरीकडे नियुक्तीची प्रतीक्षा असे चित्र आहे. बांधकाम खात्यात ‘टोल-फ्री’ काहीच नाही, असे अभियंते सांगतात.