संविधान वाचनाचा विक्रम

By Admin | Updated: November 27, 2015 02:55 IST2015-11-27T02:55:11+5:302015-11-27T02:55:11+5:30

संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला संविधान अर्पण केले. त्यानिमित्त हा दिवस संविधान दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो.

The record of constitution reading | संविधान वाचनाचा विक्रम

संविधान वाचनाचा विक्रम

‘आम्ही भारताचे लोक’ : यशवंत स्टेडियमवर हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग
नागपूर : संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला संविधान अर्पण केले. त्यानिमित्त हा दिवस संविधान दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. यंदा केंद्र आणि राज्य सरकारने सुद्धा संविधान दिन उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेत संपूर्ण देशात संविधानाचा जागर करण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी नागपुरातील यशवंत स्टेडियमवर आयोजित भव्य सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विद्यार्थ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून शपथ घेतली. तब्बल एक लाख २५ हजार विद्यार्थ्यांनी एकत्र येत संविधान वाचन करून एक नवा विक्रम प्रस्थापित केल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.
राज्य शासनाचा सामाजिक न्याय विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि मैत्री परिवाराच्या सहकार्याने यशवंत स्टेडियम येथे संविधान दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर प्रवीण दटके, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, आ. अनिल सोले, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर देशमुख, आ. डॉ. मिलिंद माने, आ. नागो गाणार, आ. सुधाकर कोहळे, आ. विकास कुंभारे, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव उज्जल उके, समाज कल्याण आयुक्त पियुश सिंह, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, आदिवासी विभागाच्या अप्पर आयुक्त माधवी खोडे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, कुलसचिव डॉ. पुरण मेश्राम, समाज कल्याण विभागाचे विभागीय आयुक्त माधव झोड, सहाय्यक आयुक्त मंगेश वानखेडे प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी एशिया बुक आॅफ रेकॉर्ड आणि लिम्का बुक आॅफ रेकॉर्डच्या प्रतिनिधी सुनीता क्षीरसागर-धोटे या आवर्जून उपस्थित होत्या. संविधानाच्या उद्देशिकेचे स्मृतिचिन्ह व तुळशीचे रोप देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी प्रास्ताविक केले. माधुरी यावलकर यांनी संचालन केले. राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आभार मानले.
संविधानामुळेच देश महासत्ता होईल - मुख्यमंत्री
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारताचे संविधान हे जगातील सर्वोत्कृष्ट संविधान असून या संविधानामुळेच भारत जागतिक महासत्ता होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. विद्यार्थ्यांना संविधानाची शपथ दिल्यानंतर ते मार्गदर्शन करीत होते. मुख्यमंत्री म्हणाले, संविधानाच्या उद्देशिकेत संपूर्ण संविधान सामावले आहे. संविधानाची प्रस्तावना आपल्या जीवनात अंगिकारल्यास भारताला महासत्ता होण्यास कुणीच रोखू शकणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाटचालसुद्धा संविधानानुसारच असल्याने देश प्रगतीपथावर आहे. राज्य शासनसुद्धा संविधानाला अनुसरून कार्य करेल आणि राज्याला विकसित करेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
संविधानाचा आत्मा बदलू शकतच नाही -गडकरी
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी हे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. त्यांचा रेकॉर्ड करून ठेवलेला संदेश यावेळी दाखविण्यात आला. यात ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान हे सर्वोत्कृष्ट आहे. संविधानाची उद्देशिका हा संविधानाची आत्मा आहे. ती कधीच बदलू शकत नाही. आज संविधानाच्या सामूहिक वाचनाच्या कार्यक्रमातून भविष्याची नवीन फळी निर्माण होईल, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.
सिने अभिनेते सिद्धार्थ जाधव विशेष आकर्षण
सिने अभिनेते सिद्धार्थ जाधव, भारत गणेशपुरे, प्राजक्ता माळी आणि निशा परुळेकर हे संविधान समारंभाचे मुख्य आकर्षण होते. यावेळी भारत गणेशपुरे आणि निशा परुळेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत संविधानामुळेच देश बळकट असल्याचे मत व्यक्त केले.
मैत्री परिवारने सांभाळली चोख व्यवस्था
संविधान दिनाचा राज्यातील मुख्य शासकीय कार्यक्रम यशवंत स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता. शासकीय यंत्रणा कामाला लागली असली तरी कार्यक्रमाच्या नियोजनाची संपूर्ण व्यवस्था ही मैत्री परिवारावर सोपविण्यात आली होती. त्यांनी आपली संपूर्ण व्यवस्था चोखपणे पार पाडीत हा अभूतपूर्व कार्यक्रम यशस्वी केला. मैत्री परिवारचे सचिव प्रा. प्रमोद पेंडके, अध्यक्ष प्रा. संजय भेंडे यांच्यासह संजय नखाते, राजू वरभे, विजय जथे, शरद सूर्यवंशी, मिलिंद देशकर, सुहास खरे, प्रफुल्ल मनोहर, विजय शहकार, अशोक जैन, राम वाडी, अर्चना कोठेवार, मंजुषा पांढरीपांडे, रश्मी देशकर, राधा सहस्त्रभोजनी, मृणाल पाठक आणि अपर्णा मनोहर आदींसह मैत्री परिवारच्या अनेक सदस्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: The record of constitution reading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.