‘चिमणीचं मत कुणाला’ वास्तववादी प्रयोग
By Admin | Updated: September 18, 2014 00:46 IST2014-09-18T00:46:13+5:302014-09-18T00:46:13+5:30
बुद्धिजीवी नाट्य रसिकांना आकर्षित करणाऱ्या भाजपा सांस्कृतिक आघाडी व संजय भाकरे फाऊंडेशनतर्फे आयोजित प्रायोगिक रंगभूमी चळवळीने सध्या चांगलेच बाळसे भरले आहे. या मासिक नाट्य

‘चिमणीचं मत कुणाला’ वास्तववादी प्रयोग
संजय भाकरे फाऊंडेशनची निर्मिती : नवोदितांचा सकस अभिनय
नागपूर : बुद्धिजीवी नाट्य रसिकांना आकर्षित करणाऱ्या भाजपा सांस्कृतिक आघाडी व संजय भाकरे फाऊंडेशनतर्फे आयोजित प्रायोगिक रंगभूमी चळवळीने सध्या चांगलेच बाळसे भरले आहे. या मासिक नाट्य सादरीकरण उपक्रमांतर्गत एका वेगळ्या विषय आणि आशयाच्या ‘चिमणीचं मत कुणाला?’ या एकांकिकेचे सादरीकरण करण्यात आले. हा प्रयोग साईकृपा मंगल कार्यालय, रहाटे चौक येथे सादर करण्यात आला. या वास्तववादी नाट्यप्रयोगाने रसिकांना अंतर्मुख केले.
या नाटकाचे लेखन विवेक गरुड यांनी केले होते. संजय भाकरे आणि कुणाल गडेकर निर्मित या प्रयोगाचे कुशल दिग्दर्शन मंगेश बावसे व अबोली केळकर यांचे होते. यात मंगेश बावसे, आदित्य धुळधुळे, सुवर्णा बोरकर, डॉ. स्मिता माहूरकर, अक्षय जोशी, मधुरा माने, अभय देशमुख, केतकी कुळकर्णी आदींनी भूमिका साकारली. या सर्व कलावंतांना ज्येष्ठ दिग्दर्शक गजानन पांडे यांचे मार्गदर्शन लाभले. रसिकांना विचार देणारे आणि अंतर्मुख करणारे हे सादरीकरण होते. मराठी रंगभूमीवर सामाजिक आणि वैचारिक प्रबोधन घडविणाऱ्या या नवप्रवाहाला उपस्थितांचा उत्तम प्रतिसाद लाभला. नाटक हा एक सकस कलाप्रकार आहे. केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन करावे, एवढाच सीमित उद्देश न ठेवता प्रस्थापित शासनप्रणालीतील व्यवस्थेबद्दल रसिकांना सजग करणारा हा प्रयोग होता. प्रचलित निवडणूक प्रक्रियेतील उणिवांवर ताशेरे ओढणारे हे नाट्य होते. लोकशाही शासन प्रणालीत राजसत्तेचे परिवर्तन घडविणाऱ्या या सशक्त निवडणूक प्रक्रियेबद्दलची उदासिनता व तळागाळातील नागरिकांना निवडणूक यादीतून वगळून त्यांच्या मूलभूत अधिकारांपासून उदासिनतेला एका चिमणीच्या माध्यमातून संवेदनतेने सादर करण्यात आले. आपल्या देशाला मिळालेले स्वातंत्र्य टिकविण्यासाठी आज डोळस व व्यापक मतदानाची नितांत गरज आहे. त्यादृष्टीनेही उपेक्षित मतदारांच्या उद्वेगाला वाचा फोडणारे एका व्यापक विषयावरील नेटक्या सादरीकरणाचे हे वास्तववादी नाट्य होते. सर्वच कलावंतांनी ताकदीने सादरीकरण करून हा विषय यशस्वीपणे रसिकांपर्यंत पोहोचविला. याप्रसंगी स्वरगंधा पुरस्काराने प्रसिद्ध संगीतकार मोरेश्वर निस्ताने आणि प्रतिभावंत गायिका श्रुती जैन यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला सुधाकर बावसे, दिलीप ठाणेकर, नारायण जोशी, रश्मी फडणवीस, चेतना टांक प्रामुख्याने उपस्थित होते. सचिन गिरी, सम्राज्ञी वैद्य, अनिता भाकरे, दिलीप देवरणकर, केयूर भाकरे, विशाल यादव, मकरंद भालेराव यांनी नाटकासाठी महत्त्वाचे योगदान दिले. (प्रतिनिधी)