कर्मातूनच होते व्यक्तीची खरी ओळख
By Admin | Updated: January 28, 2015 01:03 IST2015-01-28T01:03:03+5:302015-01-28T01:03:03+5:30
कुठल्या धर्मात किंवा जातीत जन्म घेतला यातून व्यक्ती लहान किंवा मोठी ठरत नसते तर व्यक्तीचे कर्म आणि त्याच्या वागणुकीतूनच त्याची खरी ओळख पटते. भगवान गौतम बुद्ध

कर्मातूनच होते व्यक्तीची खरी ओळख
बेल्लनविला विहाराया : गौतम बुद्धांच्या विचारांवर गुंफले विचारपुष्प
नागपूर : कुठल्या धर्मात किंवा जातीत जन्म घेतला यातून व्यक्ती लहान किंवा मोठी ठरत नसते तर व्यक्तीचे कर्म आणि त्याच्या वागणुकीतूनच त्याची खरी ओळख पटते. भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांमध्येदेखील हेच मानवतावादी मार्गदर्शन दिसून येते, असे मत श्रीलंका येथील श्री जयवर्देनेपुरा विद्यापीठाचे कुलपती प्रा. बेल्लनविला विमलरत्न राजमहा विहाराया यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे आयोजित डॉ. नितीन राऊत आंतरराष्ट्रीय व्याख्यानमालेप्रसंगी ते बोलत होते. बुद्ध धम्मातील सामाजिक विचार व तत्त्वज्ञान या विषयावरील व्याख्यानाचे त्यांनी मंगळवारी पहिले पुष्प गुंफले.
विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात झालेल्या या व्याख्यानमालेच्या प्रसंगी माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, प्र-कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, कुलसचिव डॉ.अशोक गोमाशे हे प्रामुख्याने उपस्थित होते. गौतम बुद्ध यांनी मानवतेचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. आजच्या युगात त्यांच्या विचारांवर चालणे आवश्यक झाले आहे. गौतम बुद्ध यांना जाती-धर्मांमुळे मनुष्यांमध्ये करण्यात येणारा भेदभाव अमान्य होता. सर्व व्यक्ती समान आहेत हाच संदेश त्यांनी दिला. शिवाय समाजव्यवस्थेत महिलांचे स्थानदेखील पुरुषांच्या बरोबरीचे असल्याचे त्यांचे विचार सांगतात. कुटुंबात पती व पत्नी दोघांचाही दर्जा समान असून त्यांना समान आदर मिळाला पाहिजे अला स्त्री-पुरुष एकतेचा संदेश गौतम बुद्धांच्या शिकवणीतून येतो असे विहाराया यांनी प्रतिपादन केले.
बुद्ध धम्माचे तत्त्वज्ञान स्वातंत्र्य आणि समानतेवर आधारीत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी याच मार्गावर चालून भारतातील कोट्यवधी नागरिकांना समान दर्जा मिळवून दिला. आज इतर धर्म व संप्रदायातील तसेच पाश्चिमात्य देशांतील व्यक्तींनादेखील बुद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानाची रुची असून अनेक जण त्याचे धडे घेत आहेत असे विहाराया यांनी सांगितले. यावेळी विद्यापीठातील अधिकारी, विभागांतील प्राध्यापक, कर्मचारी व नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.(प्रतिनिधी)