प्रमाणपत्रासाठी रांगा
By Admin | Updated: May 20, 2014 01:07 IST2014-05-20T01:07:27+5:302014-05-20T01:07:27+5:30
शाळा-महाविद्यालयांच्या निकालांचे दिवस जसजसे जवळ येत आहेत, तसतशी जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू केंद्रातील गर्दी दिवसेंदिवस सातत्याने वाढतच चालली आहे.

प्रमाणपत्रासाठी रांगा
सेतू केंद्रात निपटारा संथ : विद्यार्थी, पालकांची वाढली गर्दी
नागपूर : शाळा-महाविद्यालयांच्या निकालांचे दिवस जसजसे जवळ येत आहेत, तसतशी जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू केंद्रातील गर्दी दिवसेंदिवस सातत्याने वाढतच चालली आहे. दरम्यान, निवडणुकीमुळे प्रलंबित असलेल्या विविध प्रमाणपत्रांचा निपटारा करण्याबाबत मात्र जिल्हा प्रशासन उदासीन असल्याचे चित्र पुढे आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू केंद्रात नॉन क्रिमीलिअर, उत्पन्न, वय, अधिवास, राष्ट्रीयत्व आणि जात प्रमाणपत्र तयार करून दिले जाते. उन्हाळ्यात या केंद्रात विविध प्रमाणपत्रांसाठी येणार्या विद्यार्थी व त्यांचे पालक तसेच इतरही नागरिकांची गर्दी वाढते. यंदाही टप्प्याटप्प्याने ही गर्दी वाढू लागली आहे. सेतू केंद्रात एकूण २२ खिडक्यांची व्यवस्था करण्यात आली असून, तेवढेच कर्मचारी केंद्रात कार्यरत आहेत. जिल्हाधिकार्यांच्या देखरेखीत या केंद्राचे कामकाज चालते. येथे येणार्यांसाठी गेल्या वर्षीपासून विविध सुविधा देणे सुरू करण्यात आले आहे. यंदाही कूलर, पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर कूलर लावण्यात आले आहेत. दलालांना आळा घालण्यासाठी पोलिसांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज १००० ते १२०० अर्ज स्वीकारल्या जातात. शाळा-महाविद्यालयांचे निकाल जाहीर झाल्यानंतर ही संख्या दीडपटीने वाढते. प्रमाणपत्रासाठी आलेल्या अर्जाचा ३० दिवसांत निपटारा व्हावा, असे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले असून, त्यासाठी प्रत्येक उपजिल्हाधिकार्यांना प्रमाणपत्रावर सह्या करण्यासाठी दिवस वाटून देण्यात आले आहेत. मधल्या काळात महसूल यंत्रणा निवडणुकीत व्यस्त असल्याने, अधिकार्यांकडे सहीसाठी गेलेली प्रमाणपत्रे प्रलंबित होती. पण दोन उपजिल्हाधिकार्यांच्या मदतीने काही प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. मात्र अद्यापही अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. काही उपजिल्हाधिकार्यांनी तर चक्क स्वाक्षरी करण्यासच नकार दिल्याची माहिती आहे. एकीकडे सेतू केंद्रात गर्दी वाढत चालली आहे तर दुसरीकडे प्रमाणपत्राचा निपटारा वेळेत होत नसल्याने त्याचा फटका अर्जदारांना बसतो आहे. जात प्रमाणपत्राच्या संदर्भात शासनाने केलेल्या नवीन नियमांची अनेकांना माहिती नाही. अर्जदाराचा आजोबा किंवा पणजोबा यांचा ज्या जिल्ह्यात जन्म झाला त्याच जिल्ह्यातून हे प्रमाणपत्र देण्याच्या सूचना आहेत. त्यासाठी दिनांक ठरवून दिला आहे. मात्र अनेकांना ही माहिती नसल्याने ते सुद्धा सेतू केंद्रात गर्दी करीत आहेत. सेतू केंद्रातील गर्दी कमी करण्यासाठी गेल्यावर्षी तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी प्रत्येक शाळेत शिबिर आयोजित केले होते. त्यासाठी त्यासाठी त्यांनी शाळा व महाविद्यालयांची मदत घेतली होती. त्यामुळे अनेकांना त्यांच्या शाळेतच प्रमाणपत्रे मिळण्याची संधी मिळाली होती. यावर्षी अद्याप या दिशेने कुठलीही पावले उचलली गेली नाही, हे येथे उल्लेखनीय.(प्रतिनिधी) दुसर्या सेतूचा मुहूर्त केव्हा... राज्य शासनाने प्रत्येक उपविभागासाठी स्वतंत्र सेतू केंद्र सुरू करण्याचे आदेश मार्च महिन्यातच दिले होते. नागपूर उपविभागासाठी तहसील कार्यालयात सेतू केंद्र सुरू करण्यास तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी मंजुरीही दिली होती. त्यानंतर त्यांची बदली झाली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली. वास्तविक आचारसंहिता लागू करण्याच्या आधीच सौरभ राव यांनी नव्या सेतू केंद्राची फाईल निकाली काढली होती. पण अद्यापही तहसील कार्यालयात सेतू केंद्र सुरू होऊ शकले नाही. हे केंद्र सुरू झाले असते तर जिल्हाधिकारी कार्यालयातील केंद्रावरील भार कमी झाला असता. दलालांवर नजर सेतू केंद्रात दलालांचा शिरकाव होऊ नये, यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. नागरिकांनी दलालांमार्फत प्रमाणपत्र प्राप्त करण्याचे प्रयत्न करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दलालांकडून मिळणारे प्रमाणपत्र बोगस असल्याचे अलीकडच्या काळात आढळून आले आहे. पोलिसांनी गेल्यावर्षी एक टोळी पकडली होती. यंदाही काही महिन्यापूर्वी अशाच प्रकारची एक टोळी पकडण्यात आली असून, त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेली प्रमाणपत्रे बोगस असल्याची आढळून आली होती, हे येथे उल्लेखनीय. महासेवा केंद्र सेतूतील गर्दी कमी करण्यासाठी शासनाने काही खाजगी महासेवा केंद्रे सुरू केली आहेत. तेथेही विविध प्रमाणपत्रे देण्याची सोय असून, ती शहराच्या विविध भागात सुरू करण्यात आली आहेत. नागरिकांनी या केंद्राचा फायदा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.