माणसाला माणसाशी जोडण्याचा प्रयत्न रामदास आठवले : भारत भीमयात्राचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2016 03:04 IST2016-04-27T03:04:07+5:302016-04-27T03:04:07+5:30

जाती तोडो, भारत जोडो हा समता संदेश घेऊनच भारत भीमयात्रा देशभरात फिरत आहे.

Ramdas Athavale: Welcome to India's Bimanatra | माणसाला माणसाशी जोडण्याचा प्रयत्न रामदास आठवले : भारत भीमयात्राचे स्वागत

माणसाला माणसाशी जोडण्याचा प्रयत्न रामदास आठवले : भारत भीमयात्राचे स्वागत

नागपूर : जाती तोडो, भारत जोडो हा समता संदेश घेऊनच भारत भीमयात्रा देशभरात फिरत आहे. या यात्रेमधून माणसाला माणसाशी जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानातील भारत उभा करण्याचा आमाचा प्रयत्न आहे, असे विचार रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (ए) अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी येथे मांडले.
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) नागपूर जिल्ह्याच्यावतीने मंगळवारी संविधान चौकात भारत भीम यात्राचे स्वागत करण्यात आले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मंचावर रिपाई (ए)चे महाराष्ट्राचे अध्यक्ष भूपेश थुलकर, माजी आमदार अनिल गोंडाणे, भीमराव बन्सोड, एल.के. मडावी, पवन गजभिये, केशव धाबर्डे, सुधाकर तायडे, दयाल बहादुरे, राजन वाघमारे, दादाकांत धनविजय आदी उपस्थित होते.
खा. आठवले म्हणाले, समाजात परिवर्तन होत असताना खैरलांजी सारखे प्रकरण घडत आहे. म्हणून आपण जागे होऊन, एकत्र येऊन या विरोधात लढा दिला पाहिजे. परंतु अजूनही आपण गटागटात विखुरल्या गेलो आहोत. नागपुरातील उत्तर नागपूरची जागा सोडल्यास कुठूनच आपण आपल्या मतावर निवडून येत नाही.
या उलट दुसरे नेते आपल्या मतांवर निवडून येत आहे. भाजपाला साथ दिली याचा अर्थ असा नव्हे की आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ‘अजेंडा’ चालवितो. ही एक राजकीय युती आहे. भविष्यात आम्ही या पक्षासोबत राहूच असे नाही, असेही ते म्हणाले.
भूपेश थुलकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समतेचे विचार आहे, आणि याच विचाराने प्रेरित होऊन आम्ही भारत भीमयात्रेला सुरुवात केली आहे. २६ जानेवारीला कन्याकुमारी येथून सुरू झालेली ही यात्रा २८ हजार किलोमीटरचे अंतर कापत मंगळवारी नागपुरात आली आहे.
या यात्रेचा समारोप १ मे रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्म स्थळ महू या ठिकाणी होईल. त्यांनी यावेळी विदर्भात समता सैनिक दलाची स्थापना करण्यासाठी जबाबदारी स्वीकारा, असे आवाहन केले.
यावेळी सुधाकर तायडे, दुर्वास चौधरी, भीमराव बन्सोड, बाळू घरडे व अनिल गोंडाणे यांनी आपले विचार मांडले. प्रास्ताविक आर.एस. वानखेडे यांनी केले. संचालन राजू बहादुरे यांनी तर आभार डॉ. मनोज मेश्राम यांनी मानले. (प्रतिनिधी)

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात काम करणार
रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात काम करण्याची माझी भूमिका आहे. एकच पक्ष रिपब्लिकन पक्ष, असा माझा नारा आहे. परंतु या नंतर जर कुणी फाटाफूट करीत असेल तर त्याला आपल्या जिल्ह्यात, शहरात पाय ठेवू देऊ नका, असे आवाहन खा. आठवले यांनी केले.

Web Title: Ramdas Athavale: Welcome to India's Bimanatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.