परिसर स्वच्छतेसाठी जनजागृती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:09 IST2021-02-12T04:09:39+5:302021-02-12T04:09:39+5:30
नागपूर : नागरिकांनी स्वच्छतेचे नियम पाळावे याकरिता जनजागृती करावी आणि यासंदर्भात २४ फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करावा, असे आदेश मुंबई ...

परिसर स्वच्छतेसाठी जनजागृती करा
नागपूर : नागरिकांनी स्वच्छतेचे नियम पाळावे याकरिता जनजागृती करावी आणि यासंदर्भात २४ फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जनहित याचिकाकर्ते अॅड. पवन ढिमोले व अॅड. सारंग निघोट यांना दिले. त्यांनी गांधीसागर तलाव व परिसराच्या स्वच्छतेसाठी जनहित याचिका दाखल केली आहे.
याचिकेवर न्यायमूर्तीद्वय नितीन जामदार व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. गांधीसागर तलाव व परिसरात सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. परिसरात कचरा फेकणाऱ्यांवर कुणाचेच नियंत्रण नाही. तलावात मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा साचला आहे. तलाव अंतर्बाह्य स्वच्छ करणे आवश्यक आहे. तलावाचे सौंदर्यीकरण करण्याची अनेक वर्षे जुनी मागणी आहे. परंतु, त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे. योग्य देखभाल होत नसल्यामुळे तलावाची दुरवस्था झाली आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. मनपाने त्यावर उत्तर सादर करून तलाव स्वच्छतेसाठी केलेल्या उपाययोजनांची न्यायालयाला माहिती दिली. त्यानंतर न्यायालयाने याचिकाकर्त्यांनी गांधीसागर तलावाशी संबंधित समस्या न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या, हे चांगलेच आहे. पण त्यांनी याशिवाय स्वत:ही याविषयी जनजागृती करायला हवी, असे मत व्यक्त करीत सदर आदेश दिले.