लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाळ्याला जेमतेम सुरुवात झाली आहे. मात्र, मुसळधार पावसापूर्वीच रेल्वेची लेटलतिफी सुरू झाली आहे. विविध मार्गावरील नागपूरमार्गे धावणाऱ्या अनेक गाड्या विलंबाने नागपुरात पोहोचत आहेत. संतरागाछी एक्स्प्रेस तर आज तब्बल १६ तास विलंबाने नागपुरात पोहोचली. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
मुसळधार पावसामुळे रेल्वे गाड्या उशिरा धावतात. दरवर्षी पावसाळ्यात हे प्रकार घडतात. मात्र, यंदा पावसाळ्याला जेमतेम प्रारंभ झाला असतानाच रेल्वे गाड्या विलंबाने धावण्याचा प्रकार सुरू झाला आहे. वेगवेगळ्या ठिकाणाहून नागपूरमार्गे धावणाऱ्या तब्बल १० रेल्वे गाड्या आज लेट झाल्या. त्यातील ट्रेन नंबर २०८२१ संतरागाछी हमसफर एक्स्प्रेस तब्बल १६ तास विलंबाने नागपुरात पोहोचली. ०७०२४ चरलापल्ली एक्स्प्रेस स्पेशल ट्रेन १० तास, १२८१० मुंबई मेल ४.३० तास, शालीमार एक्स्प्रेस ४ तास, १२६२६ केरला एक्स्प्रेस ३.३० तास, १२१०२ ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस ३.१० तास, ०७०७७ देहरादून स्पेशल एक्स्प्रेस ३ तास, १२२९६ संघमित्रा एक्स्प्रेस २ तास, ०२१३९ मुंबई-नागपूर स्पेशल १.३० तास तर २०८०६ एपी एक्स्प्रेस आणि १२७२३ तेलंगणा एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या प्रत्येकी १ तास विलंबाने नागपुरात पोहोचल्या. यामुळे या गाड्यांनी प्रवास करीत असलेल्या तसेच या गाड्यांनी नागपुरातून पुढे प्रवास करण्याचे नियोजन करून असलेल्या प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.