संघभूमीत राहुल गांधी आखणार रणनीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2015 02:39 IST2015-04-29T02:39:49+5:302015-04-29T02:39:49+5:30

भूमी अधिग्रहण विधेयकाला विरोध करीत संकटग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी अ.भा. काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष राहुल गांधी ...

Rahul Gandhi plans strategies in Sangh Bharat | संघभूमीत राहुल गांधी आखणार रणनीती

संघभूमीत राहुल गांधी आखणार रणनीती

नागपूर : भूमी अधिग्रहण विधेयकाला विरोध करीत संकटग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी अ.भा. काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे ३० एप्रिल रोजी अमरावती जिल्ह्यात ‘किसान पदयात्रा’ काढत आहेत. यासाठी बुधवारी, २९ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता दिल्लीहून विमानाने त्यांचे नागपुरात आगमन होईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात राज्य व विदर्भातील निवडक नेत्यांशी रविभवनात रात्री चर्चा करून ते रणनीती आखणार आहेत.
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना विदर्भानेच बळ दिले होते. आता लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी तीच ऊर्जा मिळविण्यासाठी विदर्भात येत असल्याची चर्चा आहे. निवडणुकीपूर्वी राहुल गांधी यांनी सुराबर्डी येथे विदर्भातील पदाधिकाऱ्यांशी जिल्हानिहाय चर्चा केली होती. ही भेट पदाधिकाऱ्यांपुरती मर्यादित होती. आता ते थेट शेतकऱ्यांच्या भेटीला येत आहेत. नागपूर मुक्कामी त्यांच्याकडे कमी वेळ आहे. ३० एप्रिल रोजी ते पहाटेच अमरावती जिल्ह्यातील गुंजी या गावासाठी रवाना होतील. त्यामुळे कमी वेळात राहुल गांधी यांच्यापुढे विदर्भातील चित्र मांडण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण हे दुपारी १२ वाजता नागपुरात दाखल होत आहेत. दोन्ही नेते विदर्भातील स्थानिक नेत्यांची बैठक घेऊन ‘किसान पदयात्रा’ यशस्वी करण्यासाठी सूचना देतील. रविभवनात विदर्भातील प्रमुख व निवडक नेत्यांनाच प्रवेश दिला जाणार असून संबंधित नेत्यांशी राहुल गांधी हे चर्चा करतील. (प्रतिनिधी)

Web Title: Rahul Gandhi plans strategies in Sangh Bharat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.