नियमांना धाब्यावर बसवून धावताहेत रेडियो कॅब
By Admin | Updated: August 27, 2016 02:11 IST2016-08-27T02:11:04+5:302016-08-27T02:11:04+5:30
शहरवासीयांना कमी खर्चात प्रवासाची सुविधा देण्याचा दावा करणाऱ्या रेडियो कॅब नियमांना धाब्यावर बसवून धावत आहेत.

नियमांना धाब्यावर बसवून धावताहेत रेडियो कॅब
परिवहन विभागाचे दुर्लक्ष : परमिटशिवाय सुरू आहे व्यवसाय
नागपूर : शहरवासीयांना कमी खर्चात प्रवासाची सुविधा देण्याचा दावा करणाऱ्या रेडियो कॅब नियमांना धाब्यावर बसवून धावत आहेत. हा व्यवसाय करणाऱ्या अनेक संचालकांकडे परमिट नसून चालकाच्या मनात येईल तिथे हे वाहन उभे केले जात असल्याचे समोर आले आहे. यातील अनेक वाहने आॅल इंडिया परमिट असलेली आहेत. परंतु ज्यासाठी हे परमिट मिळवले ते सोडून स्थानिक प्रवासी वाहतूक केली जात आहे. आॅल इंडिया परमिटच्या नावावर करात सूट मिळवून शासनाला चुना लावला जात आहे. विशेष म्हणजे, कॅबच्या या गोरखधंद्याकडे परिवहन विभागाचे अजिबात लक्ष नाही.
समन्वयच नाही
रेडियो कॅब ही मोबाईल अॅप्सच्या माध्यमातून संचलित होते. यात वाहनाचा मालक कुणी वेगळा असतो आणि चालक कुणी वेगळा. याबाबतची सर्व माहिती पोलीस अन् परिवहन विभागालाही नसते. फक्त कमिशन लाटण्यासाठी कॅबला कंपनीशी जोडून प्रवासी वाहतुकीची मुभा दिली जाते.
चौकशी का होत नाही?
मोटर व्हेईकल अॅक्टनुसार, खासगी टॅक्सीला शहरात चालविण्यासाठी आरटीओची परवानगी घेणे आवश्यक आहे. परमिट देण्याआधी आवश्यक पार्किंग स्थळ आणि कागदपत्रांची तपासणी केली जाते. या निकषांच्या पडताळणीनंतर परमिट दिले जाते. परंतु रेडियो कॅब या नियमांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. रेडियो कॅबचे शहरात कार्यालय नाही अन् पार्किंगसाठी निर्धारित जागाही नाही.
वाहनांचा दुरुपयोग!
मिळालेल्या माहितीनुसार, कॅबने केलेल्या प्रवासाची सर्व माहिती अॅपमध्ये नोंदविली जाते. परंतु वेळेचे काही बंधन नसते. याचा गैरफायदा काही लोक घेतात. ड्रंक अॅण्ड ड्राईव्हमध्ये पकडले जाऊ नये म्हणून कॅबचा वापर केला जातो. सुविधेच्या नावावर वाहनातच मद्यपानाची सूटही दिली जाते.
चालकांची खासगी माहिती उपलब्ध नाही
कॅब चालवणारे अनेक चालक स्थानिक नसल्याने त्यांची खासगी माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होत आहे. शहरात धावणाऱ्या बहुतेक कॅब पर जिल्ह्यातील व प्रदेशातील चालक चालवत असतात.
अनेकदा होतात भांडणे
स्थानिक आॅटो आणि टॅक्सीचालकांनी कॅबवर कारवाईची मागणी अनेकदा केली आहे. परंतु अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही. रेल्वे स्टेशन आणि बस स्टँडवर सवारी मिळवण्यावरून आॅटो आणि कॅबचालकांमध्ये भांडण ही नित्याचीच गोष्ट झाली आहे. हे टाळण्यासाठी आता कॅबचालकांनी रेल्वे स्टेशन फ्लायओव्हर आणि कस्तूरचंद पार्कजवळ डेरा टाकणे सुरू केले आहे. यामुळे संतापलेल्या आॅटो चालक युनियनच्या कृती समितीने ३१ आॅगस्टला बंदची घोषणा केली आहे. युनियनचे पदाधिकारी अल्ताफ अन्सारी सांगतात, ई-रिक्षा आणि रेडियो कॅबमुळे त्यांचा व्यवसाय ठप्प पडला आहे. नियम धाब्यावर बसवूनसुद्धा कुणीच या लोकांविरुद्ध कारवाई करीत नाहीत.