कोट्यवधींचा ठेवा साध्या कपाटात

By Admin | Updated: April 6, 2016 03:19 IST2016-04-06T03:19:49+5:302016-04-06T03:19:49+5:30

कोट्यवधींची वाकाटककालीन नाणी गायब झाल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्व विभागातील त्रुटी समोर येत आहेत.

Put lots of billions in a simple cupboard | कोट्यवधींचा ठेवा साध्या कपाटात

कोट्यवधींचा ठेवा साध्या कपाटात

नागपूर विद्यापीठ : प्राचीन इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विभागाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
नागपूर : कोट्यवधींची वाकाटककालीन नाणी गायब झाल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्व विभागातील त्रुटी समोर येत आहेत. या विभागातील संग्रहालयात कोट्यवधींचा ठेवा आहे. संग्रहालयात नाणी तसेच मूर्तींची प्रतिकृती ठेवण्यात आली असून मूळ ठेवा एका साध्या लोखंडी कपाटात बंद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या विभागाकडे लक्ष देण्यासाठी पूर्णवेळ सुरक्षारक्षकदेखील नसल्याने येथील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
१९६७ साली पवनारजवळील शेतात सापडलेली २०० हून अधिक नाणी विभागात आता नसल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणली होती. याबाबतचा चौकशी अहवालदेखील गायब झाला असून या प्रकरणातील गूढ वाढले आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने या विभागाची पाहणी केली असता धक्कादायक बाब समोर आली. विद्यापीठाच्या ‘कॅम्पस’च्या भिंतीला अगदी लागून हा विभाग आहे. या विभागातील संग्रहालयात विविध ठिकाणी उत्खननात सापडलेले प्राचीन अवशेष, मूर्ती तसेच नाणी ठेवण्यात येतात. संग्रहालय अगदी प्रवेशद्वारानंतरच असून येथे देखरेख करण्यासाठी कुणीही व्यक्ती नाही. सुरक्षेची खबरदारी म्हणून येथे ‘सीसीटीव्ही’ लावण्यात आले आहेत. परंतु त्याकडे विभागप्रमुखांचे फारसे लक्षच नसते. ‘लोकमत’ प्रतिनिधीने थेट संग्रहालयात जाऊन तेथील ऐतिहासिक वस्तूंची पाहणी केली. त्यावेळीदेखील कुणीही तेथे नव्हते. काचेच्या पेटीमध्ये विविध नाणी, प्राचीन शस्त्रे, मूर्ती ठेवलेल्या होत्या. तर बाजूच्या खोलीतील कपाटात मूळ ठेवा होता. अगदी सहजपणे या गोष्टी कोणीही घेऊन जाऊ शकतो. आश्चर्याची बाब म्हणजे विभागातील स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या संग्रहालयाच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे पाणी पिण्याच्या बहाण्याने कुणीही तेथे जाऊ शकतो व तेथून आत शिरकाव करू शकतो. याबाबतीत विभागाकडून आतापर्यंत दक्षता का घेण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.(प्रतिनिधी)

विभागप्रमुखांचा हलगर्जीपणा
डॉ. प्रीती त्रिवेदी यांनी २०१३ सालच्या अखेरीस विभागप्रमुखाचे पद स्वीकारले. या विभागात कोट्यवधींचा ठेवा आहे याची त्यांना माहिती असूनदेखील त्यांनी सुरक्षेसंदर्भात विद्यापीठाकडे मागणी केली नाही. मुळात या विभागात इतका मौलिक ठेवा आहे याची अधिकाऱ्यांना माहितीच नव्हती. या ठेव्याच्या रक्षणासाठी प्रशासनाला कळविणे हे विभागप्रमुखांचे काम होते. त्यांना यासंदर्भात आता कुठे जाग आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Web Title: Put lots of billions in a simple cupboard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.