मेट्रो रेल्वेच्या खड्ड्याने वाहनचालकांना धक्के
By Admin | Updated: January 6, 2017 02:31 IST2017-01-06T02:31:01+5:302017-01-06T02:31:01+5:30
वर्धा रोडवर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत रस्त्याच्या मध्यभागी पिलरची निर्मिती आणि त्यावर गर्डर टाकण्यात येत आहेत.

मेट्रो रेल्वेच्या खड्ड्याने वाहनचालकांना धक्के
नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष : अपघाताची दाट शक्यता
आनंद शर्मा नागपूर
वर्धा रोडवर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत रस्त्याच्या मध्यभागी पिलरची निर्मिती आणि त्यावर गर्डर टाकण्यात येत आहेत. याशिवाय मेट्रो स्थानकाच्या बांधकामाची प्रक्रिया सुरू झाली आहे. कामादरम्यान रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वर्धा रोडवरून जाणाऱ्या वाहनचालकांना दररोज जोरदार झटके सहन करावे लागत आहे.
पिलर उभारण्यापूर्वी मातीच्या परीक्षणासाठी खोदलेले खड्डे योग्यरीत्या न बुजविल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मेट्रोचे काम तातडीने करण्याच्या नादात नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचा बेजबाबदारपणा उघड झाला आहे.
पाहणी करून खड्डे बुजविणार : आपटे
याप्रकरणी नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे उपमहाव्यवस्थापक (जनसंपर्क व समन्वय) शिरीष आपटे यांनी सांगितले की, मेट्रो रेल्वेच्या कामादरम्यान तयार झालेल्या खड्ड्यांची पाहणी करून ते तात्काळ बुजविण्यात येईल.
जियो टेक्निकल सर्वेक्षण कारणीभूत
मेट्रो पिलर उभारण्यापूर्वी जमिनीच्या आत माती वा दगडाच्या तपासणीसाठी जियो टेक्निकल सर्वेक्षण करण्यात आले होते. आनंदीवाला टेक्निकल कन्सल्टन्सी कंपनीने हे काम केले. त्यानंतर नागार्जुन बांधकाम कंपनीने दुसऱ्यांदा सर्वेक्षण केले. त्यानंतर वर्धा रोडवर दुभाजकालगत काही अंतरावर खोदलेल्या खड्ड्याला डांबर आणि काँक्रिटने बुजविण्यात आले होते. पण हे काम कंपनीने योग्यरीत्या केले नाही.
वर्धा रोडवर नागपूरकडे येताना उज्ज्वलनगर चौक, जयप्रकाशनगर चौक, साईमंदिर ते छत्रपती चौक, छत्रपती चौक ते रॅडिसन ब्ल्यू चौकापर्यंत रस्त्यावरील काँक्रिट निघाले आहे, तर काही ठिकाणी डांबर दबून पुन्हा खड्डे पडले आहेत. त्यामुळे स्पीड ब्रेकरसारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना या रस्त्यावरून जाताना जोरदार झटके बसत आहेत. मेट्रो प्रकल्पाचे काम तातडीने करण्याच्या नादात नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन आणि कंत्राटदार कंपनीचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे या मार्गावर निरंतर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.