जनता हीच महापौरांची शक्ती
By Admin | Updated: September 5, 2014 01:11 IST2014-09-05T01:11:21+5:302014-09-05T01:11:21+5:30
जनता हीच महापौरांची खरी शक्ती असते. जनतेने योग्य प्रतिसाद दिला तरच कोणताही प्रकल्प, मोहीम यशस्वी होत असते. माझ्या कार्यकाळात जनतेने मला मोलाचे सहकार्य केले. त्यामुळेच लोकसहभागातून

जनता हीच महापौरांची शक्ती
महापौर सोले यांनी घेतला निरोप : सेवेसाठी वेळ दिला
नागपूर : जनता हीच महापौरांची खरी शक्ती असते. जनतेने योग्य प्रतिसाद दिला तरच कोणताही प्रकल्प, मोहीम यशस्वी होत असते. माझ्या कार्यकाळात जनतेने मला मोलाचे सहकार्य केले. त्यामुळेच लोकसहभागातून मी मोठमोठी कामे करू शकलो, अशा शब्दात महापौर अनिल सोले यांनी नागपूरकरांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
अनिल सोले यांचा महापौरपदाचा कार्यकाळ आज पूर्ण झाला. सोले यांनी पत्रकारांशी हितगुज करीत अडीच वर्षांत केलेल्या कामांचा आलेख माडला. ते म्हणाले, नागनदी स्वच्छता अभियानाची पंतप्रधान नरेंद मोदी यांनी प्रशंसा केली. नागपूरकरांनी या मोहिमेत सहकार्य दिले नसते तर हे शक्य नव्हते. पीओपीच्या गणेशमूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करण्याच्या आपल्या आवाहनालाही नागपूरकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. एका दिवसात एक लाख झाडे लावण्याचा उपक्रमही जनतेमुळे यशस्वी झाला. आपल्या कार्यकाळात आपण २८९ बैठका घेतल्या. ७४० शिष्टमंडळांचे म्हणणे ऐकून घेतले. २३ सर्वसाधारण व ९ विशेष सभा घेतल्या. २६२ ठराव पारित केले. आपण आपला जास्तीतजास्त वेळ महापालिकेच्या कामासाठी दिला. लाड कमिटीअंतर्गत कर्मचाऱ्यांची नियुक्ती, शिक्षित सफाई कर्मचाऱ्यांना योग्य काम देणे, ऐवजदारांना वाढीव पगार, कर्मचाऱ्यांना पदोन्नती आदी निर्णय घेतले गेले. नामांतर शहीद स्मारकाचे लोकार्पण झाले, तर आरबीआय चौकाचे संविधान चौक असे नामकरण करण्यात आले.
एलबीटीमुळे महापालिकेसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. बीओटी तत्त्वावरील प्रकल्पांना राज्य सरकारने त्वरित मंजुरी दिली नाही. वाढीव पाणी बिल निर्लेखित करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला नाही, यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.
महापालिकेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाचा समारोप राष्ट्रपतींच्या हस्ते करण्याचा आपला प्रयत्न होता. पण आपल्या कार्यकाळात होऊ शकला नाही, याची खंत त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
निरोप घेताना ‘सर’ गहिवरले
महापौर अनिल सोले प्राध्यापक होते. त्यामुळे सर्व त्यांना आदराने ‘सर’ असेच संबोधायचे. ते तसे हळव्या मनाचे. आज सर्वांचा निरोप घेताना त्यांच्यातील हळवेपणा दिसून आला. सर्वांशी नमस्कार घेत ‘अलविदा’ म्हणताना त्यांना गहिवरून आले. सोले यांनी महापालिकेतील त्यांचे कर्मचारी, अधिकारी, पदाधिकाऱ्यांपासून ते वाहन चालकापर्यंत सर्वांची भेट घेत आभार मानले. माणूस पदावर गेला की त्याचे विरोधक वाढतात. विविध आरोप लागतात, प्रतिमा मलीन होते, आदर कमी होतो, असे पाहायला मिळते. मात्र, सोले सरांनी गेल्या अडीच वर्षांत सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवले. सर्वांना जपले. त्यामुळे पद सोडतानाही त्यांच्याविषयीचा आदर अधिक वाढला आहे, अशी प्रतिक्रिया कर्मचारी,अधिकारी व्यक्त करीत होते.