प्रकल्पग्रस्तांची पाण्यासाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:08 IST2021-05-25T04:08:44+5:302021-05-25T04:08:44+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : हरितक्रांतीची नांदी देणारा गाेसेखुर्द प्रकल्प हा प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून उभा हाेत आहे, असे म्हटल्यास वावगे ...

प्रकल्पग्रस्तांची पाण्यासाठी भटकंती
लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : हरितक्रांतीची नांदी देणारा गाेसेखुर्द प्रकल्प हा प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून उभा हाेत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण या प्रकल्पासाठी प्रकल्पग्रस्तांनी आपल्या शेतजमिनी, घरे शासनाला कवडीमाेल भावात देऊन सुखी संपन्न संसार रस्त्यावर मांडला आहे. या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले खरे, मात्र मूलभूत सुविधांपासून आजही त्यांना उपेक्षित राहावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी प्रकल्पग्रस्तांना भटकंती करावी लागत आहे.
मोखाबर्डी गट ग्रामपंचायतअंतर्गत किन्ही (कला) या प्रकल्पबाधित गावाचे पुनर्वसन तातोली शिवारात करण्यात आले. पुनर्वसनाची सर्वस्वी जबाबदारी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने पार पाडली. दरम्यानच्या काळात पुनर्वसनस्थळी नागरी सुविधेची विविध कामे होत असताना त्याकडे शासनाचे पूर्णत: दुर्लक्ष झाले. त्यामुळेच कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांनी गैरप्रकारातून प्रत्येक पुनर्वसनात निकृष्ट दर्जाची कामे उभी केली.
प्रकल्पात पाणी साठविण्याची मोहीम तीव्र होताच, बुडित गावे पाण्याखाली येऊ लागली. त्यामुळे गेल्या दोन-चार वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनस्थळी स्थानांतरण सुरू झाले आहे. मात्र तेथे पिण्याच्या पाण्यासह इतर मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाल्याने प्रकल्पग्रस्तांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या दाेन महिन्यापासून किन्ही (कला) पुनर्वसनातील प्रकल्पग्रस्त महिला, पुरुष आपल्या मुलाबाळांसह भरउन्हात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करीत असल्याचे दृश्य मन हेलवणारे आहे.
किन्ही (कला) पुनर्वसन येथील पाण्याचे तिन्ही हॅण्डपंप नादुरुस्त आहेत. या हॅण्डपंपाची माेडताेड झाली असून, कुठे पंप गायब आहे. दोन विहिरी आहेत, मात्र त्यातून पाणी काढता येत नाही. केवळ एका बाेअरवेल्सच्या बळावर गावात पाणीपुरवठा होतो. परंतु थकीत विद्युत बिलापाेटी महावितरणने वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून प्रकल्पग्रस्तांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरश: पायपीट करावी लागत असल्याची व्यथा गावकऱ्यांनी मांडली.
....
उपाेषण सुरू, अधिकाऱ्यांना फुटला घाम
वारंवार निवेदने देऊनही प्रशासन पाण्याची व्यवस्था करीत नसल्याने अखेर उपसरपंच राेशन गायधने यांनी साेमवारी (दि.२४) ‘कुणी पाणी देता का पाणी’ असा सवाल विचारत उपाेषण सुरू केले. तहसील कार्यालयाच्या आवारात भरउन्हात तरुण प्रकल्पग्रस्त उपाेषणाला बसल्याने अधिकाऱ्यांपासून लाेकप्रतिनिधींनाही घाम फुटला. उपाेषण मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. खंडविकास अधिकारी माणिक हिमाणे, नायब तहसीलदार दिनेश पवार, प्रवीण राठाेड यांच्यासह व्हीआयडीसीचे अधिकारी उपाेषणस्थळी आले. मात्र पाणी कधी मिळणार, या उपाेषणकर्त्याच्या प्रश्नावर ते अनुत्तरीित हाेते. त्यामुळे उपसरपंच राेशनचे आंदाेलन भरउन्हातही सुरूच हाेते.
......
अधिकाऱ्यांचे एकमेकांकडे बाेट
पाणीपुरवठा करणाऱ्या बाेअरवेल्सचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे किन्ही (कला) येथे पाण्याची समस्या उद्भवली आहे. पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी थकीत विद्युत देयके भरणे आवश्यक आहे. मात्र ते कुणी भरावे, यावरून अधिकाऱ्यांची आपसात घुमावघुमवी सुरू आहे. व्हीआयडीसीचे अधिकारी किन्ही (कला) पुनर्वसनाचे हस्तांतरण जिल्हा परिषदेला केल्याचे सांगत आहे, तर पंचायत समिती प्रशासन पुनर्वसित गाव आमच्याकडे हस्तांतरित झाले नसल्याचे सांगत आहे. यामुळे विद्युत बिलाचा भरणा थांबला असून, प्रकल्पग्रस्तांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जैसे थेच आहे.