आरटीईसाठी श्रीमंत पालक होताहेत गरीब
By Admin | Updated: April 6, 2016 03:16 IST2016-04-06T03:16:09+5:302016-04-06T03:16:09+5:30
आरटीईच्या २५ टक्के कोट्यातील प्रवेशासाठी अनेक सुशिक्षित आणि समृद्ध पालकांचा गरीब बनण्याकडे ओढ वाढली आहे.

आरटीईसाठी श्रीमंत पालक होताहेत गरीब
खरे लाभार्थी वंचित : उत्पन्न प्रमाणपत्र उपलब्ध होते सहज
नागपूर : आरटीईच्या २५ टक्के कोट्यातील प्रवेशासाठी अनेक सुशिक्षित आणि समृद्ध पालकांचा गरीब बनण्याकडे ओढ वाढली आहे. प्रवेशासाठी एक लाख रुपये उत्पन्नाची अट आहे. उत्पन्नाचे प्रमाणपत्र सहज उपलब्ध असल्याने सरकारी कर्मचारी, व्यावसायिक, श्रीमंत पालकांचे आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. आरईटी अॅक्शन कमिटीच्या कार्यालयात सध्या अशा पालकांची दररोज विचारणा होत आहे.
आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि दुर्बल घटकातील मुलांना क्वॉलिटी एज्युकेशन मिळावे, यासाठी सरकारने आरटीई २००९ कायद्याची अंमलबजावणी केली. सर्व खासगी व नामांकित शाळेत २५ टक्के प्रवेश आरक्षित करण्यात आले. आज शहरातील नामांकित शाळेत ५० ते १ लाखापर्यंत प्रवेशासाठीच द्यावे लागतात. अशा शाळांमध्ये आरटीई अंतर्गत नि:शुल्क प्रवेश होत असल्यामुळे सर्वसामान्य पालकांचे प्रयत्न सुरू आहे. शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेला अद्यापही सुरुवात झाली नाही. परंतु प्रवेशासाठी पालक प्रतीक्षेत आहे. पालकांची शिक्षण विभाग व आरटीई अॅक्शन कमिटीकडे दररोज विचारणा होत आहे. गेल्यावर्षी अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहे. यावर्षी नागपुरातील केंद्रीय विद्यालयाने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश दिला आहे. केंद्रीय विद्यालयाच्या अजनी शाखेत आठ तर वायुसेनेच्या शाखेत नऊ पालक सरकारी कर्मचारी आहेत. यासंदर्भात आरटीई अॅक्शन कमिटीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. (प्रतिनिधी)
प्रक्रियेत बोगसपणा
आरटीईमध्ये प्रवेशाच्या नावाखाली सर्व बोगसपणा सुरू आहे. पैसे देऊन वाटेल ते प्रमाणपत्र मिळत असल्याने अनेक श्रीमंतांनी गरिबीचे प्रमाणपत्र बनविले आहे. परंतु आजपर्यंत खऱ्या गरिबांना या प्रक्रियेत प्रवेशच मिळाला नाही. महिला व बालकल्याणच्या आयसीडीएस प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या अंगणवाड्यात शिकणारा एकही मुलगा आरटीईत लाभार्थी झाला नाही. विशेष म्हणजे ही सर्व मुले आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत. त्यांचे पालकही या प्रक्रियेपासून अनभिज्ञ आहेत. शासनाच्या आरटीईच्या धोरणानुसार अशाच मुलांना प्रवेश मिळावा, यासाठी शाळांना त्यांच्या परिसरात जनजागृती करणे गरजेचे आहे.
१) कारमधून उतरून एक महिला अॅक्शन कमिटीच्या कार्यालयात आली. या महिलेने आरटीईच्या फॉर्मसंदर्भात विचारणा केली. कार्यालयातील समन्वयकाकडून त्यांचे नाव, उत्पन्नाचे स्रोत जाणून घेण्यात आले. ती महिला स्वावलंबी नगरातील असून महिलेचे पती बॅँकेत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवेशासाठी एक लाख रुपयांची अट असल्याचे सांगण्यात आले. उत्पन्नाचे प्रमाणपत्र सहज उपलब्ध होऊन जाते. फॉर्म कधी भरायचा आहे, एवढे सांगा.
२) महागडा मोबाईल घेऊन एक व्यक्ती कार्यालयात आली. ज्यांचे सीताबर्डी परिसरात स्वत:चे हॉटेल आहे. त्यांना आपल्या मुलाची अॅडमिशन आरटीई अंतर्गत करायची आहे. त्यासाठी काय प्रक्रिया करावी लागेल, अशी विचारणा केली. प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया समजावून दिल्यानंतर समन्वयकाने त्यांना एक लाख रुपयांच्या उत्पन्नाची अट असल्याचे सांगितले. त्यावर त्या व्यक्तीने एक लाख रुपयांच्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र दिल्यास प्रवेश होईल ना, अशी विचारणा केली.