पोलिसांनी घेतला ‘हरविलेल्यांचा शोध’
By Admin | Updated: July 10, 2015 03:06 IST2015-07-10T03:06:03+5:302015-07-10T03:06:03+5:30
घरून कोणत्यातरी कारणामुळे निघून गेलेल्यांसोबतच पळविलेल्या आणि अनोळखी मृतांबाबतची ओळख पटविण्यासाठी ...

पोलिसांनी घेतला ‘हरविलेल्यांचा शोध’
काटोलमध्ये मेळावा : ७३ व्यक्तींचा शोध लावण्यात पोलिसांना यश
नागपूर : घरून कोणत्यातरी कारणामुळे निघून गेलेल्यांसोबतच पळविलेल्या आणि अनोळखी मृतांबाबतची ओळख पटविण्यासाठी नागपूर ग्रामीण पोलिसांनी ‘मिसिंग मेळावा’ हा उपक्रम सुरू केला आहे. आतापर्यंत अशाप्रकारे सावनेर, उमरेड आणि काटोलमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. त्याद्वारे ७३ व्यक्तींचा शोध घेण्यात नागपूर ग्रामीण पोलीस यशस्वी झाले.
काटोल उपविभागांतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यातील केसेससंबंधी माहिती जाणून घेण्यासाठी काटोलच्या शिंदे महिला महाविद्यालयात अशा प्रकारचा उपक्रम गुरुवारी राबविण्यात आला. याप्रसंगी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्यासह काटोलचे उपविभागीय पोलीस अधिकारी मोरेश्वर आत्राम, काटोलचे ठाणेदार दिगांबर चव्हाण, नरखेडचे ठाणेदार हेमंतकुमार खराबे, जलालखेड्याचे ठाणेदार दिनेश लबडे, कोंढाळीचे ठाणेदार पीतांबर जाधव, महिला तक्रार निवारण केंद्राच्या प्रमुख अनामिका मिर्झापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
वर्षभरात मिसिंग झालेले मुले-मुली, व्यक्ती तसेच खुनामधील व अपघातामध्ये अनोळखी व्यक्तींचा मृत्यू याबाबतचे छायाचित्र, शोधपत्रिकांचे प्रदर्शन मिसिंग मेळाव्यात लावण्यात आले होते. हरविलेल्या व्यक्तींचा तसेच इतर गुन्ह्यातील अनोळखी व्यक्ती आणि मृतांची ओळख पटविणे हा या मेळाव्याचे मुख्य उद्देश होता. काटोल विभागात येणाऱ्या काटोल, जलालखेडा, नरखेड, कोंढाळी या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मिसिंग झालेल्या व्यक्तींची माहितीही प्रदर्शित करण्यात आली होती. यामध्ये हरविलेले, पळविलेले, अनोळखी मृत यांची ओळख होण्यासाठी उपस्थित मेळाव्यामधील नातेवाईकांमार्फत ओळखण्याचा प्रयत्न करण्यात आला.
काटोल पोलीस ठाण्यातील एकूण ३४ केसेसपैकी १७ केसेसचा शोध लागला. जलालखेडा पोलीस ठाण्यातील २४ पैकी १२, नरखेडमधील ७, कोंढाळीतील २ केसेसचा यावेळी शोध लागला. (प्रतिनिधी)