पोलिसांकडून मृताच्या नातेवाईकांची दिशाभूल
By Admin | Updated: July 14, 2015 03:15 IST2015-07-14T03:15:15+5:302015-07-14T03:15:15+5:30
गोकुळपेठ कॅनल रोडवर एका कारने दुचाकीला धडक दिल्याने, दुचाकीवर बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी

पोलिसांकडून मृताच्या नातेवाईकांची दिशाभूल
नागपूर : गोकुळपेठ कॅनल रोडवर एका कारने दुचाकीला धडक दिल्याने, दुचाकीवर बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी घटनेच्या वेळी कार चालविणाऱ्याला अटक न करता, दुसऱ्याला अटक करून, थातुरमातूर कारवाई केल्याचा आरोप मृताचे नातेवाईक राजेश मोहबंसी यांनी केला आहे. याप्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्याशी समझोत्याची भाषा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
गोंदिया येथील रहिवासी शशी अनिल कटकवार (६७) या त्यांच्या नातेवाईकाकडे नागपूरला आल्या होत्या. ११ जूनला त्यांचे नातेवाईक नेहा मोहबंसी यांच्या दुचाकीवर गोकुलपेठ कॅनल रोडवरून जात असताना, मागून येणाऱ्या एमएच३१-ईए-५६१६ क्रमांकाच्या चारचाकी गाडीने धडक दिली. लगेच त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. उपचारादरम्यान १२ जूनला त्यांचा मृत्यू झाला. यादरम्यान पोलिसांनी याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करून, त्याच्यावर कारवाई केली. लगेच त्याला बेल झाली. मृताच्या अंतिम संस्कारानंतर त्यांच्या नातेवाईकांनी प्रकरणाच्या तपासासंदर्भात अंबाझरी पोलीस ठाण्यात चौकशी केली. परंतु त्यांची दिशाभूल करण्यात आली. अटक केलेल्या आरोपीला दाखवा, त्याचा पत्ता, नंबर द्या, अशी मागणी मृतकाच्या नातेवाईकांनी केली. मात्र आरोपीबद्दल कुठलीही माहिती दिली नाही. वारंवार तपास अधिकाऱ्याला विचारपूस केल्यावर, तपास अधिकाऱ्याने माहिती न देता, त्यांच्यावरच संताप व्यक्त केला. पोलीस आरोपींकडून पैसे घेऊन, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा राजेश मोहबंसी यांचा आरोप आहे. (प्रतिनिधी)