पश्चिमेत फिल गुड की ‘बाबां’चा मंत्र!
By Admin | Updated: June 9, 2014 01:25 IST2014-06-09T01:25:31+5:302014-06-09T01:25:31+5:30
दोन दशकापासून भाजपच्या ताब्यात असलेल्या पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघात यावेळी ‘फिल गुड’ की मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा विकास मंत्र, हे अद्याप स्पष्ट नाही.

पश्चिमेत फिल गुड की ‘बाबां’चा मंत्र!
काँग्रेसमध्ये घमासान : भाजपचे अनेक दावेदार
नागपूर : दोन दशकापासून भाजपच्या ताब्यात असलेल्या पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघात यावेळी ‘फिल गुड’ की मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा विकास मंत्र, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र पश्चिमचे तिकीट मिळविण्यासाठी कॉँग्रेस-भाजपमध्ये घमासान आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी विद्यमान आमदार सुधाकरराव देशमुख हे विधानसभेची निवडणूक लढणार नाहीत; त्यांच्या जागी दुसरा उमेदवार दिला जाईल, अशी चर्चा भाजपच्या गोटात रंगली होती. मात्र, लोकसभेची लीड पाहता ‘लीड पर रहा वेस्ट, सुधाकरराव बेस्ट’ असे देशमुख सर्मथक बोलू लागले आहेत. सुधाकरराव गडकरींचे निवडणूक प्रभारी होते, हे विशेष!
काँग्रेस नेते दत्ता मेघे भाजपमध्ये येणार असल्याची चर्चा जोरात असताना, येथील इच्छुक भाजप उमेदवारांना ‘नवतपा’ लागला आहे. दत्ताभाऊ भाजपमध्ये आल्यास मेघे पुत्रांना पश्चिमध्ये संधी आहे. गडकरींनी सागर यांच्या वर्धेची तिकीट रोखून ठेवली होती, हे लपलेले नाही. असे असले तरी लोकसभा निवडणुकीत अपक्ष नगरसेवक मुन्ना पोकुलवार, मीना चौधरी यांचे पुत्र कमलेश चौधरी (केदार गट) यांची मोट बांधून गडकरींसाठी जोमाने लागलेले अपक्ष नगरसेवक परिणय फुके यांच्या भाजपकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू शशिकांत बोदड, राष्ट्रीय नेते संजय जोशी यांच्याशी मैत्री असलेले रमेश चोपडे, नगरसेवक जगदीश ग्वालबन्सी यांचाही दावा तगडा आहे.
एकेकाळी काँग्रेसी मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणार्या या मतदार संघात काँग्रेसला गत दोन दशकात मतदारांनी हात दिलेला नाही. काँग्रेसचे दिग्गज नेते राजकीय वजन वापरून पश्चिमचे तिकीट आणतात, मात्र पराभूत होतात.
२00९ मध्ये लोकसभा निवडणुकीत येथे काँग्रेसला ९ हजार ७१६ मतांची आघाडी होती. भाजपने लागलीच धोका ओळखला. यानंतर तीन महिन्यांनी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे सुधाकरराव देशमुख यांनी बाजी मारली. प्रकाश गजभिये, नितीश ग्वालबन्सीच्या उमेदवारीमुळे काँग्रेसचे गणित बिघडल्याने मंत्री असतानाही अनिस अहमद यांना परावभाला सामोरे जावे लागले.
संघटनात्मक अनुभव असलेले देशमुख यांनी पश्चिममध्ये भाजपची अशी बांधणी केली की, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आपली घडी बसविताच आली नाही. येथे गडकरींना तब्बल ३७ हजार १५ मतांची आघाडी आहे. मनपा निवडणुकीत हरलेले ग्वालबन्सी बंधू काँग्रेससोबत ताकदीने उभे राहिले. त्यामुळे त्यांच्या विरोधातील भाजपची कुणबी नगरसेवकांची टीम तेवढय़ाच ताकदीने कामी लागली.
इकडे काँग्रेसकडून वित्त व ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक, शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी दावेदारी केल्याने मामला टफ झाला आहे. काँग्रेसच्या मतांचे गणित बिघडविणारे गजभिये विधान परिषदेवर गेल्याने मुळक रिलॅक्स झाले असले तरी, पश्चिममध्ये विकासाचा पॅटर्न चालेल की मुख्यमंत्री चव्हाण यांचा मंत्र, हे काळच सांगेल. मात्र सध्या काँग्रेसचा वर्तमानकाळ वाईट आहे! जिंकण्याची क्षमता नसलेल्यांना या पक्षात तिकीट मिळतात. इकडे लोकसभेची लीड पाहून माजी मंत्री अनिस अहमद यांची पश्चिमकडे वळलेली गाडी एकाएकी थांबल्याचे दिसत आहे.
मात्र आम आदमी पार्टीने या मतदार संघात काँग्रेस अथवा भाजपच्या असंतुष्टाला मैदानात उतरविले तर विधानसभेत दोन्ही पक्षाला येथे काहीअंशी झाप मिळेल, हे निश्चित! कारण कॉँग्रेसच्या काही इच्छुक उमेदवारांनी बायोडाटाचे एक पत्र ‘आप’कडेही पाठविले आहे. लोकसभेत ‘आप’ने काँग्रेसच्या परंपरागत मतांना खिंडार पाडत तब्बल १३ हजार ७६ मते घेतली. मात्र, बहुसंख्य दलित, मुस्लीम, ख्रिश्चन, आदिवासी, कुणबी मतदार असलेल्या या मतदार संघात तिकीट वाटप करताना दोन्ही पक्षांना जातीय समीकरणाचाही विचार करावा लागेल, हे निश्चित.