पवनसूत-गृहलक्ष्मी डेव्हलपर्सवर धाड
By Admin | Updated: May 21, 2014 01:12 IST2014-05-21T01:12:12+5:302014-05-21T01:12:12+5:30
शेकडो भूखंडधारकांना सुलभ किस्तीने भूखंड देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये गोळा करणार्या पवनसूत आणि गृहलक्ष्मी डेव्हलपर्सच्या कार्यालय आणि

पवनसूत-गृहलक्ष्मी डेव्हलपर्सवर धाड
शेकडो भूखंडधारकांची फसवणूक : संचालक फरार
नागपूर : शेकडो भूखंडधारकांना सुलभ किस्तीने भूखंड देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये गोळा करणार्या पवनसूत आणि गृहलक्ष्मी डेव्हलपर्सच्या कार्यालय आणि निवासस्थानी गुन्हेशाखेच्या पोलिसांनी आज छापे घातले. दरम्यान, कारवाईची कुणकुण लागताच संचालक सुरेश बुरेवार फरार झाला. त्याचा मोबाईलही ‘स्विच्ड आॅफ’ आहे. या कारवाईमुळे नागपूरच्या बिल्डर लॅण्ड डेव्हलपर्समध्ये खळबळ निर्माण झाली आहे. मिहान प्रकल्पामुळे नागपूरचे शांघाय होणार, अशा भूलथापा मारून अनेक बिल्डर - लॅण्ड डेव्हलपर्सनी नागपूरच्या आजूबाजूच्या भागात मोठ्या प्रमाणावर ले-आऊट टाकून भूखंड विकले. हे करताना त्यांनी आवश्यक त्या परवानग्याच घेतल्या नाही. एवढेच काय, अनेक डेव्हलपर्सनी शेतमालकाच्या जागेची रीतसर विक्रीही केली नाही. शेतकर्यासोबत त्याच्या जमिनीच्या खरेदीचा करारनामा करून तेथे आपला बोर्ड लावला आणि आकर्षक ब्रोशर तयार करून कागदावरच अनेकांना प्लॉट विकले. छत्रपती चौकातील पवनसूत रियल इस्टेट अॅण्ड डेव्हलपर्सचा मालक संतोष कोंडबाजी बुरेवार आणि त्याचा भाऊ सुरेश कोंडबाजी बुरेवार (रा. मनीषनगर) या दोघांनी खोब्रागडे नामक शेतकर्याच्या पत्नीसोबत मौजा खापरी डव्वा येथील शेतजमिनीचा सौदा केला. तिला तुटपुंजी रक्कम देऊन तिच्याकडून जमिनीच्या व्यवहाराची पॉवर आॅफ अॅटर्नी करून घेतली. त्याआधारे खसरा क्रमांक ७१ मध्ये लेआऊट टाकून अनेकांना प्लॉट विक्रीचा सपाटा लावला. २००५ ते २००८ या कालावधीत ५०० पेक्षा जास्त जणांना त्यांनी सुलभ किस्तीने भूखंड विकले. २००८ ला सर्व पैसे दिल्यानंतर भूखंड घेणार्यांनी विक्रीसाठी तगादा लावला. मात्र, बुरेवार बंधूंनी त्यांना तब्बल सहा वर्षे झुलविले. गेल्या वर्षी संतोष बुरेवारचा मृत्यू झाला. त्यानंतर तीन-चार महिन्यांपूर्वी शेकडो भूखंडधारक छत्रपती चौकातील कार्यालयावर धडकले. यावेळी सुरेश बुरेवार आणि त्याच्या नातेवाईकांनी या प्रकरणाशी आपला काही संबंध नसल्याचा कांगावा सुरू केला. सुरेशने आपले व्यवहार गृहलक्ष्मी लॅण्ड डेव्हलपर्सच्या नावाने चालते असे सांगून, भूखंडधारकांची समजूत काढली. लवकरच सर्वांना त्यांच्या भूखंडाची विक्री करून मिळेल, असेही सांगितले.मात्र आता चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊनही भूखंडाची विक्री किंवा आपली रक्कम परत मिळत नसल्याचे पाहून बुरेवार बंधूंच्या छत्रपती आणि दोसरभवन चौकातील कार्यालयात भूखंड घेणार्यांची गर्दी वाढली. रोजच शंभरपेक्षा जास्त जण भूखंड द्या किंवा पैसे परत करा, अशी मागणी करू लागले. सुरेश बुरेवार प्रत्येक वेळी खोटेनाटे बोलून वेळ मारून नेत असल्याचे पाहून विजेंद्र अशोक गोजे (वय ३९, रा. कोठीरोड महाल) यांनी सदर जमिनीचा सातबारा काढला. तेव्हा तो भलत्याच व्यक्तीच्या नावाने असून, बुरेवार किंवा त्याच्या कंपनीचा संबंधच त्या जमिनीशी नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गोजेंनी गुन्हेशाखेत तक्रार नोंदवली. त्यांच्या पाठोपाठ शंभरावर जणांनी गुन्हेशाखेत धाव घेतली. (प्रतिनिधी) गुन्हे दाखल, आरोपी फरार या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संतोष बुरेवार आणि सुरेश बुरेवार या दोघांवर गुन्हेशाखेच्या आर्थिक पथकाने कलम ४०६, ४२०, ३४ तसेच महाराष्ट्र गुंतवणूकदार हित संरक्षण कायदा (एमपीआयडी) कलम ३ अन्वये गुन्हे दाखल केले. संतोषचा मृत्यू झाला आहे तर, सुरेश बुरेवार फरार झाला असून, त्याने आपले मोबाईलही बंद करून ठेवले आहे. चार पथके, तीन ठिकाणी छापे गुन्हे दाखल केल्यानंतर गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत भोये यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक नरेश पवार, माणिक नलवडे, संभाजी मुरकुटे, हवलदार चक्रधर राऊत,अनिल पाटील, महेंद्र सरोदे आणि कनिका पाटील आदींच्या चार पथकांनी छत्रपती चौक तसेच दोसर भवन चौकातील कार्यालय आणि बुरेवारचे मनीषनगरातील निवासस्थान अशा तीन ठिकाणी छापे घातले. या छाप्यात पोलिसांना कोट्यवधींच्या स्थावर मालमत्तेची आणि व्यवहाराची कागदपत्रे हाती लागली.