पानसरे मोठे समाज शिक्षक होते
By Admin | Updated: February 22, 2015 02:32 IST2015-02-22T02:32:39+5:302015-02-22T02:32:39+5:30
कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्यात आगळ्यावेगळ्या कार्यकर्त्याचा नमुना होते. राजकारण, साहित्य, संस्कृती या समाजातील सर्वच क्षेत्रात त्यांचे चाहते असून ...

पानसरे मोठे समाज शिक्षक होते
नागपूर : कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्यात आगळ्यावेगळ्या कार्यकर्त्याचा नमुना होते. राजकारण, साहित्य, संस्कृती या समाजातील सर्वच क्षेत्रात त्यांचे चाहते असून ते एक मोठे समाज शिक्षक होते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी आज येथे केले.
प्रगतिशील लेखक संघातर्फे धरमपेठ राजाराम वाचनालयात ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. व्यासपीठावर प्रगतिशील लेखक संघाचे राज्य कार्याध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी होते. डॉ. यशवंत मनोहर म्हणाले, गोविंदराव पानसरेंच्या व्यक्तिमत्त्वातून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. समाजातील सगळ्या चळवळीत क्रांतीच्या विचारांचे ओघ एकत्र आणणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला कुठलीच एक चौकट नाही. सर्वसामान्यांना एका मर्यादित परिघातून बाहेर पडण्याचा सल्ला त्यांनी आपल्या आयुष्यातून दिला. अशा परिवर्तनवाद्यांना संपवून पुरोगामीवाद्यांना घाबरविण्याचा हा प्रयत्न असून या विरोधात महाराष्ट्राने एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी म्हणाले, पानसरेंच्या हत्येमागील मानसिकतेमुळे आपण माणूस आहोत की नाही हा प्रश्न निर्माण होतो. पानसरे वंचितांच्या समृद्ध जीवनाची स्वप्न पाहणारे व्यक्तिमत्त्व होते. शत्रूंना मित्र करण्याची कला असल्याचा उल्लेख केला.
आकांक्षा प्रकाशनच्या अरुणा सबाने यांनी पानसरेंनी अनेक संघटना स्थापन करून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढा दिल्याचे सांगितले. प्रकाश राठोड यांनी परिवर्तनवादी माणसे राजरोसपणे मारल्या जात असल्याची खंत व्यक्त केली. प्रकाश दुलेवाले यांनी विचारांनी लढा देणाऱ्यांवर भ्याड हल्ला करणे शरमेची बाब असल्याचे सांगितले. अरुण लाटकर यांनी पानसरेंच्या निधनामुळे डाव्या चळवळीचे मोठे नुकसान झाल्याचे मत व्यक्त केले. अशोक थुल यांनी श्रमिकांच्या चळवळीत काम करताना पानसरेंनी कधीच तडजोड केली नसल्याचे सांगितले.
डॉ. इंद्रजित ओरके यांनी पानसरेंच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरणार असल्याचे सांगितले. डॉ. प्रमोद मुनघाटे पानसरेंचा खून झाला तरी त्यांचे विचार आजही जिवंत असल्याचे मत व्यक्त केले. प्रमोद वाळके यांनी पोलीस यंत्रणा कमकुवत असेल तर पुरोगामीवाद्यांनी आपली यंत्रणा उभी करण्याचे आवाहन केले. संगीता महाजन यांनी कार्यकर्त्यांना परिपक्व करण्याचे काम पानसरेंनी केल्याचे सांगून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. संचालन प्रसेनजित गायकवाड यांनी केले.(प्रतिनिधी)