ऑक्सिजनमुळे रखडले समृद्धी महामार्गाचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:06 IST2021-06-20T04:06:59+5:302021-06-20T04:06:59+5:30
कमल शर्मा नागपूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण करण्याची नवीन डेडलाईन ठरविण्यासाठी विभाग विचारविमर्श करीत आहे. ...

ऑक्सिजनमुळे रखडले समृद्धी महामार्गाचे काम
कमल शर्मा
नागपूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण करण्याची नवीन डेडलाईन ठरविण्यासाठी विभाग विचारविमर्श करीत आहे. या महामार्गाचे काम मे महिन्यात पूर्ण करण्याचा दावा करण्यात आला होता. कोरोनाच्या संक्रमणामुळे वेळेत काम पूर्ण होणे शक्य झाले नाही. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे वेल्डिंगचे काम थांबले होते. त्यामुळे आता सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये काम पूर्ण करण्याचा दावा केला जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी या प्रकल्पाचा आढावा घेतला. नागपूर ते मुंबईपर्यंत हा महामार्ग बनत आहे. या प्रकल्पाचे नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या टप्प्याचे काम थांबले आहे. बैठकीत या प्रकल्पावर काम करीत असलेले महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन (एमएसआरडीसी)चे अधिकारी हे काम पूर्ण करण्यासाठी डेडलाईन ठरवू शकले नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या समीक्षा बैठकीचा हवाला देताना अधिकाऱ्यांनी याबाबत चुप्पी साधली; पण उच्चस्तरीय सूत्रांचा दावा आहे की, ऑक्टोबरमध्ये समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्याचा प्रयत्न आहे; पण हे सर्व कोरोना संक्रमणाच्या परिस्थितीवर निर्भर आहे.
कोरोनामुळे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. विशेष म्हणजे वेल्डिंगचे काम थांबलेले आहे. कोरोना संक्रमणामुळे ऑक्सिजन केवळ रुग्णालयांसाठीच आरक्षित करण्याचा निर्णय झाला होता. फेब्रिकेशन, वेल्डिंगच्या कामासाठी ऑक्सिजनचा उपयोग होतो. मार्च ते मे महिन्यांदरम्यान ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकला नाही. आता सर्व काही ऑक्सिजनच्या उपलब्धतेवर निर्भर आहे.
मे २०२१ ला सुरू होणार होता महामार्ग
समृद्धी महामार्गावर वाहतूक कधी सुरू होईल, याची प्रतीक्षा महाराष्ट्रातील जनतेला आहे. राज्य सरकारने दावा केला होता की, या प्रकल्पाचा पहिला टप्पा (नागपूर ते शिर्डी) १ मे २०२१ ला सुरू होईल; परंतु कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत ७२ टक्के काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात शिर्डी ते इगतपुरी दरम्यान १०३ किलोमीटरचा मार्ग डिसेंबरपर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे. इगतपुरी ते वडपे दरम्यानचा रस्ता १ मार्च २०२२ पर्यंत सुरू होण्याचा दावा केला जातोय. आता एमएसआरडीसीचे म्हणणे आहे की सर्वच डेडलाईन बदलाव्या लागणार आहेत.