पंतप्रधानांनी धनगर समाजाला आरक्षण नाकारल्याच्या केवळ अफवा
By Admin | Updated: April 2, 2017 02:44 IST2017-04-02T02:44:11+5:302017-04-02T02:44:11+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे झालेल्या बैठकीला आपण स्वत: उपस्थित होतो.

पंतप्रधानांनी धनगर समाजाला आरक्षण नाकारल्याच्या केवळ अफवा
मुख्यमंत्री धनगर आरक्षणाबाबत सकारात्मक : विकास महात्मे यांची माहिती
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे झालेल्या बैठकीला आपण स्वत: उपस्थित होतो. त्या सभेत धनगर आरक्षणाच्या विषयावर कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी धनगर समाजाला आरक्षण नाकारण्याचा प्रश्न उद्भवत नाही. या सर्व केवळ अफवा आहेत. धनगर समाज बांधवांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन खासदार डॉ. विकास महात्मे यांनी एका पत्रकार परिषदेत केले.
ते पुढे म्हणाले, राज्यात टीआयएसएसचा अत्यंत व्यवस्थित सर्वे सुरू आहे. शिवाय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: धनगर आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. मात्र आपण जे घडलेच नाही, त्यावर चर्चा करीत आहोत आणि ज्या सकारात्मक बाबी घडल्या त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. आजपर्यंत कधीच एकाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत छातीठोकपणे ‘धनगर आरक्षण’ या विषयावर भाष्य केले नव्हते, मात्र देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत, ज्यांनी विधानसभेत ते सांगितले. नुकत्याच ११ मार्च रोजी आपण धनगर समाज संघर्ष समितीच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांसोबत बैठक केली. त्या बैठकीत टीआयएसएसचे प्रमुख पदाधिकाऱ्यांसह आदिवासी विभागाच्या प्रमुख सचिव सुद्धा उपस्थित होत्या. यात टीआयएसएसकडून होत असलेल्या दिरंगाईवर नाराजी व्यक्त करताच, मुख्यमंत्र्यांनी अहवाल ताबडतोब देण्याचे निर्देश दिले. डिसेंबर ऐवजी नोव्हेंबरमध्येच सर्वे पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या. धनगर समाजाबाबत मागील ६५ वर्षांत प्रथमच एवढ्या सकारात्मक गोष्टी घडत आहे. त्यामुळे समाज बांधवांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. असे त्यांनी पुन्हा आवाहन केले. खा. सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला ही चांगली गोष्ट आहे. पण यासोबतच मला काही प्रश्नही पडले आहेत, इतके वर्षे आपण सत्तेत असताना धनगर आरक्षणाची कधीच आठवण का झाली नाही? धनगर आरक्षणाला समर्थन तर दूरच याउलट केंद्र सरकारकडे नकारात्मक अहवाल पाठवून कोंडी केली. त्यामुळेच आज टीआयएसएसच्या माध्यमातून हा सर्वे करावा लागत आहे. आपल्याच पक्षाचे आदिवासी मंत्री मधुकर पिचड होते, तेव्हा कधीच धनगर आरक्षणाचा पुळका का आला नाही, असाही यावेळी त्यांनी प्रश्न उपस्थित केला.(प्रतिनिधी)