नक्षलग्रस्त गडचिरोलीत केवळ ८ हजार ३२९ किमीचेच रस्ते
By Admin | Updated: July 4, 2014 01:07 IST2014-07-04T01:07:16+5:302014-07-04T01:07:16+5:30
या नक्षलग्रस्त जिल्ह्यात केवळ ८३२९.७६ किमी लांबीच्याच रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे रस्ते विकासाचा मोठा अनुशेष निर्माण झाला आहे. रस्ते व पुलांच्या बांधकामाला

नक्षलग्रस्त गडचिरोलीत केवळ ८ हजार ३२९ किमीचेच रस्ते
बीआरओ गेले : रस्त्यांची कामे नक्षलवाद्यांमुळेही रखडली
गडचिरोली : या नक्षलग्रस्त जिल्ह्यात केवळ ८३२९.७६ किमी लांबीच्याच रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे रस्ते विकासाचा मोठा अनुशेष निर्माण झाला आहे. रस्ते व पुलांच्या बांधकामाला नक्षलवाद्यांचा कायम विरोध राहत असल्याने दुर्गम भागात रस्ते विकासाचे काम करणे कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभाग या दोघांसाठीही अडचणीचे ठरत आहे.
२६ आॅगस्ट १९८२ ला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली हा नवा जिल्हा निर्माण करण्यात आला. त्याच वेळी जिल्ह्यात नक्षलवादी चळवळीचाही उदय झाला. नक्षलवाद्यांची पाळेमुळे अल्पावधीतच भक्कमपणे रोवल्या गेली. त्यांनी विकासाला कायम विरोध केला आहे. रस्ते, पूल, मोबाईल टॉवर उभारणीच्या कामालाही नक्षलवाद्यांचा विरोध आहे.
त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ८३२९.७५ किमी लांबीचेच रस्ते होऊ शकले. यामध्ये ५० किमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग, १३०५.१५ किमी लांबीचा राज्य महामार्ग, ९२९.४८ किमी लांबीचा मोठा जिल्हा मार्ग, १३५२.९९ किमी लांबीचे अन्य जिल्हा मार्ग व ४६९२.१२ किमी लांबीचे व्हिलेज रस्ते पूर्ण करण्यात आले. जिल्ह्याच्या आदिवासीबहुल भागात १४१०७ चौ.किमी, गैर आदिवासीबहुल भागात १३२७.०० चौ. किमी तर जंगलव्याप्त भागात १३२०० चौ. किमी लांबीचे रस्ते निर्माण करण्यात आले.
रस्ते उभारण्यासाठी १९८५ नंतर सीमासडक संघटन (बीआरओ)ला आणण्यात आले होते. त्यांनी एटापल्ली, भामरागड आदी भागात रस्ते व पूल उभारणीचे काम केले. भामरागड तालुक्यात पामुलगौतम नदीवर धोडराजवळील पूल तर एटापल्ली येथे बांडे नदीवर मोठा पूल उभारला. याशिवाय रस्त्यांचीही अनेक कामे पूर्ण केली. २०१२ मध्ये जिल्ह्यातून बीआरओने आपला गाशा गुंडाळला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हे काम सोपविण्यात आले. २००९ मध्ये नक्षलवाद्यांनी अनेक बांधकाम व्यावसायिकांची हत्या केली त्यामुळे रस्ते विकासाच्या कामाची गती मंदाविली.
आजही जवळजवळ १५ ते २० कामे बंद पडून आहेत. अनेक कामांना कंत्राटदार मिळेनासे झाले आहेत. नक्षलवाद्यांकडून कंत्राटदारांची वाहने जाळल्याच्याही घटना गेल्या ५ वर्षांत वाढल्या आहेत. या घटनांमध्ये सुमारे ४ कोटी रूपयाची हानी झालेली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)