काँग्रेस-राष्ट्रवादीचे केवळ १० आमदार प्रभावशाली
By Admin | Updated: May 19, 2014 00:49 IST2014-05-19T00:49:51+5:302014-05-19T00:49:51+5:30
महाराष्ट्रासह देशभरात काँग्रेसच्या पानिपतासाठी ‘नमो’ त्सुनामीसह विविध कारणांचा यासाठी बागुलबुवा केला जात आहे. मात्र राज्यातील या पक्षाच्या काही आमदारांनी आघाडीच्या उमेदवारांना आपल्या

काँग्रेस-राष्ट्रवादीचे केवळ १० आमदार प्रभावशाली
विलास गावंडे -यवतमाळ
महाराष्ट्रासह देशभरात काँग्रेसच्या पानिपतासाठी ‘नमो’ त्सुनामीसह विविध कारणांचा यासाठी बागुलबुवा केला जात आहे. मात्र राज्यातील या पक्षाच्या काही आमदारांनी आघाडीच्या उमेदवारांना आपल्या मतदारसंघातून आघाडी मिळवून दिली आहे. राज्यात सत्ता असलेल्या या पक्षाच्या एकूण १४४ सदस्यांपैकी केवळ १० आमदार प्रभावशाली ठरले आहे. लोकसभेत महायुतीचा उमेदवार विजयी झालेल्या मतदारसंघातील हे आमदार आहेत. २८८ सदस्य संख्या असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत काँग्रेसचे ८२ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ६२ सदस्य आहेत. १४ व्या लोकसभेत हे आमदार आपल्या पक्षाच्या उमेदवाराला आघाडी मिळवून देतील, ही स्वाभाविक अपेक्षा असताना केवळ १० आमदार या परीक्षेत पास झाले आहेत. लोकसभेच्या बहुतांश मतदारसंघात आघाडीतील सहकारी पक्षाने प्रामाणिकपणे काम केले नाही, अशी ओरड आहे. याच कारणाखाली आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र दहा आमदारांनी आपल्या मतदारसंघात घेतलेली आघाडी या प्रश्नालाही बाजूला सारणारी आहे. प्रत्येक पक्षात मतभेद असतातच पण परिस्थिती पाहून त्याला सामोरे जावे लागते. नेमके हेच या दहा आमदारांनी दाखवून दिले आहे. इतर आमदारांसाठी हा एक धडा आहे. महाराष्ट्रातील काही मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. या मतदारसंघांमध्ये असलेल्या या पक्षाच्या काही आमदारांना आघाडी मिळवून देता आली नसली तरी इतर सहकारी आमदारांनी दिलेली साथ या पक्षाच्या उमेदवारांच्या यशात मैलाचा दगड ठरली आहे. लोकप्रतिनिधीचा आपल्या मतदारसंघावर प्रभाव असला तर कुठलीही लाट आणि विरोध झुगारून यश संपादन करता येते, हेच यातून सिद्ध झाले आहे.