कांदे, बटाटे महागणार
By Admin | Updated: June 17, 2014 00:55 IST2014-06-17T00:55:05+5:302014-06-17T00:55:05+5:30
यावर्षीही शेतकऱ्यांनी साठवणूक केलेला कांदा विक्रीस काढला आहे. पावसाळ्यात शेतकी कामासाठी लागणारा पैसा उभा करण्यासाठी शेतकरी कांद्याची विक्री करतात. पण लगेचच विक्रीही बंद करतात.

कांदे, बटाटे महागणार
आवक कमी : मालाची साठवणूक
नागपूर : यावर्षीही शेतकऱ्यांनी साठवणूक केलेला कांदा विक्रीस काढला आहे. पावसाळ्यात शेतकी कामासाठी लागणारा पैसा उभा करण्यासाठी शेतकरी कांद्याची विक्री करतात. पण लगेचच विक्रीही बंद करतात. याच कारणामुळे यावर्षीही जूनच्या अखेरीस कांदा महाग होण्याची दाट शक्यता आहे. गेल्यावर्षी किरकोळमध्ये कांदा प्रति किलो ६० रुपये विकला होता, हे विशेष.
गेल्यावर्षीप्रमाणे भाववाढ नाही
पावसाळ्यात कांद्याची मागणी कमी होते. कळमना ठोक बाजारात गेल्या काही दिवसांआधी कमी झालेली कांद्याची आवक सध्या वाढली आहे. पांढरे आणि लाल कांद्याचे ४० ट्रक येत आहेत. आवक वाढली पण भाव कमी झाले नाहीत. दर्जानुसार लाल कांदा ५५० ते ६५० रुपये मण (४० किलो) आणि पांढरा कांदा ६५० ते ७०० रुपये मण आहे. आवक कमी होताच ठोकमध्ये प्रति किलो भाव २५ ते ३० रुपयांवर जाण्यास वेळ लागणार नाही. गेल्यावर्षीची स्थिती यावर्षी उद्भवणार नाही, अशी माहिती कळमन्यातील आलू-कांदा असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी लोकमतशी बोलताना दिली.
उन्हाळी कांद्याची साठवणूक करता येते. पण यावर्षी पावसामुळे कांदा बऱ्याच प्रमाणात खराब झाला. याच कारणाने कांद्याची साठवणूक ही जोखीम ठरू शकते, ही कल्पना शेतकऱ्यांना आल्याने बहुतांश शेतकरी कांदा टप्प्याटप्प्याने विक्रीसाठी आणत आहेत. शेतकऱ्यांकडे साठवणुकीची अनेक साधने उपलब्ध असल्याने गेल्या काही वर्षांपासून शेतकरी पैसा उभा करण्यासाठी मालाची विक्री करू लागले आहेत. या पद्धतीचा अवलंब पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी केला आहे. भाववाढीसाठी शेतकऱ्यांचे हे तंत्र आहे. विदर्भातही लागवड मोठ्या प्रमाणात होत असल्याने कळमन्यात अकोला, अमरावती आणि बुलढाणा येथून कांद्याची आवक आहे. याशिवाय नाशिक, मनमाड, अहमदनगर येथून दरदिवशी ८ ते १० गाड्या कळमन्यात येत आहेत.
किरकोळमध्ये बटाटे ३० रुपयांवर!
काही दिवसांपर्यंत भाज्यांच्या किंंमती सामान्यांच्या आवाक्यात होत्या. त्यामुळे गृहिणींकडून बटाट्याला फारशी मागणी नव्हती. पण पावसाळ्यात भाज्या महाग होण्याच्या भीतीने बटाट्याचा किमती वाढू लागल्या आहेत. ठोक बाजारातही दर्जानुसार भाव प्रति किलो १९ रुपयांवर गेले आहेत. किरकोळमध्ये ३० रुपयात विक्री सुरू आहे. पालेभाज्यांच्या किमती वाढल्यास बटाट्याच्या मागणीत वाढ होईल आणि किमती वधारतील, असे वसानी यांनी स्पष्ट केले.
कळमन्यात छिंदवाडा, आग्रा, कानपूर, अहमदाबाद येथून आवक सुरू आहे. दररोज १६ ते २० ट्रकची आवक आहे. रविवारी चांगल्या प्रतीच्या बटाट्याचे भाव ६५० ते ७६० रुपये मण (४० किलो) होते. (प्रतिनिधी)