दोन दिवसात अधिकाऱ्यांच्या शंभर गावांना भेटी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:07 IST2021-05-30T04:07:02+5:302021-05-30T04:07:02+5:30
महत्त्वाच्या घडामोडी ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला चालना आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, तलाठी सक्रिय पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या समन्वयात बैठकी ...

दोन दिवसात अधिकाऱ्यांच्या शंभर गावांना भेटी ()
महत्त्वाच्या घडामोडी
ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला चालना
आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, तलाठी सक्रिय
पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या समन्वयात बैठकी
कोरोनामुक्त गाव करण्यासाठी प्रोत्साहन
पावसाळ्याच्या तोंडावर प्रशासनाची जनजागृती
गावकऱ्यांच्या सूचनांचा आराखड्यामध्ये समावेश
गावातील कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित
गावपातळीवरील शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट व म्युकरमायकोसिस प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या दोन दिवसात अधिकाऱ्यांनी शंभराहून अधिक गावे पिंजून काढली. जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या मोहिमेचा नियमित आढावा घेत असून, ग्रामीण भागाला कोरोना सावटातून दूर काढण्यासाठी या मोहिमेतून गावागावाचा कृती आराखडा तयार केला जात आहे.
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनात १३ तालुक्यांमध्ये ५२ अधिकाऱ्यांना जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांमार्फत प्रशासनातील गावपातळीवरील कार्य करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, संबंधित गावाचे सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोरोना, म्युकरमायकोसिस प्रतिबंधासाठी कोणती उपाययोजना करायची, गावामध्ये कसा कृती आराखडा तयार करायचा, याबाबतचे मार्गदर्शन केले जात आहे. सर्व अधिकाऱ्यांना यासंदर्भात कार्यशाळा घेऊन प्रशिक्षित करण्यात आले असून, जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिडिओद्वारे गावागावात मार्गदर्शन केले जात आहे.
प्रत्येक गावामध्ये शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी गावपातळीवरील सर्व कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. सोबतच या सार्वजनिक उपक्रमात स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या कुटुंबापासून सुरुवात करून सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांमधील लसीकरणाचे भय व गैरसमज काढण्याचे कामदेखील केले जात आहे. जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी प्रत्येक टीमकडून येणाऱ्या प्रतिसादावरून प्रत्येक गावाच्या कोरोनाविरुद्ध लढायच्या आराखड्याची तयारी करत आहे.