आरटीपीसीआर चाचणीचे शिक्षकांना बंधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:51 IST2021-02-05T04:51:41+5:302021-02-05T04:51:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : २७ जानेवारीपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळा सुरू होत आहेत. शाळा सुरू करताना शासनाच्या ...

आरटीपीसीआर चाचणीचे शिक्षकांना बंधन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २७ जानेवारीपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळा सुरू होत आहेत. शाळा सुरू करताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक असल्याचे पत्र प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी जारी केले आहे. त्यानुसार प्रथम चाचणी करावी लागणार आहे, त्यानंतरच शाळेत जाता येणार आहे.
शासन निर्देशान्वये २७ जानेवारीपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतला आहे. पालकांकडून विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासंदर्भात लेखी संमती घेण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्व आस्थापनांच्या पाचवी ते आठवीपर्यंतच्या १,६८४ शाळा असून, येथे १ लाख ४८ हजार ७५६ विद्यार्थी संख्या आहे. तर १०,९९८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर या चाचणीत ते पॉझिटिव्ह आढळले तर बरे होईपर्यंत त्यांनी शाळेत उपस्थित राहू नये, असेही निर्देश वंजारी यांच्याकडून देण्यात आले आहेत.
शाळांचे निर्जंतुकीकरण
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागामध्ये सुरू होत असलेल्या शाळांचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक शाळेला विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांचे तापमान मोजण्यासाठी थर्मल गन, सॅनिटायझर, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून भित्तीपत्रके आदी वितरीत करण्यात येणार आहेत.