कल्याणजी-आनंदजींच्या संगीताचा ‘ओ साथी रे’
By Admin | Updated: September 15, 2014 01:02 IST2014-09-15T01:02:57+5:302014-09-15T01:02:57+5:30
कल्याणजी आनंदजी या जोडगोळीने आतापर्यंत अनेक चित्रपटगीतांना चाली लावल्या आणि त्या लोकप्रियही झाल्या, नव्हे कल्याणजी - आनंदजी यांचे संगीत असलेला प्रत्येक चित्रपटच त्या काळात तुफान चालला.

कल्याणजी-आनंदजींच्या संगीताचा ‘ओ साथी रे’
स्वरमधुरा संस्थेचे सादरीकरण : सुरेल गीतांनी रंगलेला कार्यक्रम
नागपूर : कल्याणजी आनंदजी या जोडगोळीने आतापर्यंत अनेक चित्रपटगीतांना चाली लावल्या आणि त्या लोकप्रियही झाल्या, नव्हे कल्याणजी - आनंदजी यांचे संगीत असलेला प्रत्येक चित्रपटच त्या काळात तुफान चालला. यात त्यांच्या संगीताचे योगदान कुणीही नाकारू शकत नाही. कायम साधेपणाने वावरणाऱ्या आणि कुणाविषयीही असूया न बाळगणाऱ्या या संगीतकारांनी अजरामर गीते रसिकांना दिलीत. त्यांच्यावर शंकर-जयकिशन यांच्या संगीताचा प्रभाव होता पण त्यांनी दिलेले संगीत स्वतंत्र प्रतिभेचे आणि रसिकांच्या काळजाला हात घालणारे होते. विविध भावनांना संगीतातून व्यक्त करताना त्यांनी निर्माण केलेली गीते प्रत्येक पिढीला रिलेट करीत जाणारी आहेत.
कल्याणजी आणि आनंदजी यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्वरमधुरा संस्थेच्यावतीने आज सायंटिफिक सभागृहात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘ओ साथी रे...’ या शीर्षकाने झालेल्या या कार्यक्रमाची संकल्पना गायक राजेश दुरुगकर यांची होती. एलसीडी प्रोजेक्टरच्या साहाय्याने काही चित्रपटातील प्रसंग आणि गीतांचे प्रसंग प्रदर्शित करण्यात येत असल्याने आपण थेट या जोडगोळीने संगीत दिलेला चित्रपटच पाहत आहोत, असा भास निर्माण झाला. डॉ. मनोज साल्पेकर यांचे निवेदन कार्यक्रमाचा रंग अधिक गडद करणारे होते. त्यात सारेच गायक कलावंत ताकदीचे आणि गाण्याचा आशय समजून मूडने गाणारे असल्याने कार्यक्रम रंगतदार ठरला. काही चित्रपटांच्या प्रसंगाच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला आणि निरंजन बोबडे यांनी ‘मेरे देश की धरती....’ हे गीत सादर करून प्रारंभीच रसिकांच्या अपेक्षा वाढविल्या. त्यानंतर राजेश दुरुगकर आणि श्रद्धा जोशी यांनी ‘हमसफर मेरे हमसफर’ हे गीत सादर करून रसिकांची दाद घेतली. गौरी परसटवार यांनी ‘छोटी सी उमर मे...’ या गीताने वन्समोअर घेतला. त्यानंतर राजेश दुरुगकर यांनी ‘कोई जब तुम्हारा हृदय तोड दे...., वक्त करता जो वफा...’ ही गीते सादर करून रसिकांना अंतर्मुख केले. सारेच गायक कसलेले असल्याने या कार्यक्रमातले प्रत्येक गीत वन्समोअर घेत होते. पण काही वेळेला रसिकांची मागणी पूर्ण करणे शक्य होत नव्हते. याप्रसंगी ‘दिल तो हे दिल, परदेसीयों से ना अखिया मिलाना, मोरे घर आयो सजना, तुने किसीसे कभी प्यार किया’ आदी अनेक गीते सादर करण्यात आली. (प्रतिनिधी)