आता विषयनिहाय लोकअदालती
By Admin | Updated: February 4, 2015 00:57 IST2015-02-04T00:57:47+5:302015-02-04T00:57:47+5:30
राष्ट्रीय विधिसेवा आणि राज्य विधिसेवा प्राधिकरणाच्या निर्देशान्वये १४ फेब्रुवारीपासून विषयनिहाय लोकअदालतींचे आयोजन करण्यात येत असून, २५ ते ३० हजार प्रकरणे निकाली

आता विषयनिहाय लोकअदालती
२५ हजारांवर प्रकरणे निकाली निघणार
नागपूर : राष्ट्रीय विधिसेवा आणि राज्य विधिसेवा प्राधिकरणाच्या निर्देशान्वये १४ फेब्रुवारीपासून विषयनिहाय लोकअदालतींचे आयोजन करण्यात येत असून, २५ ते ३० हजार प्रकरणे निकाली निघण्याची शक्यता आहे. ही माहिती मंगळवारी जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे सचिव किशोर जयस्वाल यांनी दिली.
१४ फेब्रुवारी रोजी बँक प्रकरणे, धनादेश अनादर प्रकरणे, १४ मार्च रोजी महसूल, ग्रामीण रोजगार हमी योजना आणि भूसंपादन प्रकरणे, ११ एप्रिल रोजी कामगार आणि कौटुंबिक प्रकरणे, १३ जून रोजी मोटार अपघात दावा आणि विमा दावा प्रकरणे, ११ जुलै रोजी विद्युत, पाणी, दूरध्वनी आणि सार्वजनिक सेवा प्रकरणे, ८ आॅगस्ट रोजी ग्राहक विवाद आणि कर विवाद प्रकरणे, १२ सप्टेंबर रोजी समझोतायोग्य फौजदारी प्रकरणे आणि १० आॅक्टोबर रोजी वाहतूक, क्षुल्लक प्रकरणे व महानगरपालिका प्रकरणे निकाली काढली जाणार आहेत. या विषयनिहाय लोकअदालतीत त्या त्या विषयाच्या तज्ज्ञ समित्या राहणार आहेत. त्यामुळे संबंधित आणि गरजू पक्षकारांना मोठा दिलासा मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
७६ वादपूर्व दावे निकाली
जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाच्याच वतीने जिल्हा न्यायालयात शुक्रवारी पार पडलेल्या विशेष लोकअदालतमध्ये २०० वादपूर्व दाव्यांपैकी ७६ दावे आपसी समझोत्याने निकाली काढण्यात आल्याचीही माहिती जयस्वाल यांनी दिली. या विशेष लोकअदालतच्या पॅनलचे प्रमुख सेवानिवृत्त वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश डब्ल्यू. व्ही. गुघाणे होते.