लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गावातील लहान-मोठ्या तक्रारींबाबत वर्षानुवर्षे सुरू असलेले वाद सामोपचाराने तत्काळ मार्गी लागू शकतात. यादृष्टीने आता प्रत्येक महिन्यात तिसऱ्या व चौथ्या बुधवारी जिल्ह्यातील प्रत्येक गावासाठी समाधान दिवस म्हणून राबविण्यात येईल. या दिवशी प्रत्येक गावासाठी असलेल्या सजाच्या ठिकाणी तलाठी, ग्रामसेवक व गावपातळीवरील शासकीय कर्मचारी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या तक्रारीचे समाधान करतील. याचबरोबर जे शक्य होणारी कामे आहेत ती तत्काळ मार्गी लावतील, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केली.
जिल्ह्यातील मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेस अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महिरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, जिल्हा परिषद व महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ. इटनकर म्हणाले, उत्तम प्रशासनाच्या मानकामध्ये गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक यांची कर्तव्यतत्परता ही अत्यंत महत्त्वाची असते. पाणंद रस्ते, फेरफार, पीककर्ज, संजय गांधी निराधार योजना व इतर निवडक योजना या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर थेट परिणाम करणाऱ्या आहेत. या योजनांची अंमलबजावणी अधिक पारदर्शक व तत्पर झाल्यास नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत. शासनातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या कर्तव्याप्रती गंभीर असलेच पाहिजे. तलाठी व ग्रामसेवक यांच्या गावपातळीवर उपस्थितीबाबत लवकरच एक परिपत्रक निर्गमित करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
तलाठ्यांना मार्गदर्शन
- प्रधानमंत्री धरती आबा योजना, वनपट्टे यासारख्या आदिवासी विभागाच्या योजनांना अधिक गती देण्याचे त्यांनी सांगितले.
- या कार्यशाळेत समाधान 3 दिवस, पाणंद रस्ते, अतिक्रमण मुक्त करणे, फेरफार अदालत व जिवंत सातबारा मोहीम, अॅग्री स्टॅक, पीककर्ज याबाबत उपस्थित तलाठ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
- तहसीलदार कल्याणकुमार डहाट, सचिन कुमावत, राजू रणवीर यांनी मार्गदर्शन केले.