ना कॉल, ना ओटीपी, तरीही बँकेतून रक्कम गायब !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:06 IST2021-06-20T04:06:46+5:302021-06-20T04:06:46+5:30
स्मार्टफोन वापरताना सावधगिरी बाळगा : अनोळखी ॲप परमिशन टाळा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कुणाचा कॉल आला नाही, कोणतीही ...

ना कॉल, ना ओटीपी, तरीही बँकेतून रक्कम गायब !
स्मार्टफोन वापरताना सावधगिरी बाळगा : अनोळखी ॲप परमिशन टाळा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुणाचा कॉल आला नाही, कोणतीही लिंक डाउनलोड केली नाही, कुणाला ओटीपी दिला नाही किंवा तुमचे एटीएम कार्डही सुरक्षित आहे. तरीसुद्धा तुमच्या खात्यातून रोकड गायब झाली. त्यामुळे हैराण आहात ना...?
आपली रक्कम गायब झालीच कशी, असा प्रश्न पडला ना?
तर त्याचे उत्तर तुमच्याच बेसावधपणात दडले आहे. तुम्हीच अजाणतेपणाने सायबर गुन्हेगारांना तुमची रक्कम लंपास करण्यास वाट मोकळी करून दिली आहे. आश्चर्य वाटत असले तरी हे खरे आहे!
स्मार्टफोन हाताळताना आम्ही अधिकाधिक मोफत काय मिळते ते बघत असतो. मोफत मिळविण्याच्या लालसेतून आणि आम्ही विविध अनोळखी ॲप आणि फ्री गेम डाउनलोड करतो. हे करताना नकळत आम्ही ॲपला परमिशन देत असतो. इथेच आमचे चुकते. आमच्या या बेसावधपणाचा गैरफायदा घेऊन सायबर गुन्हेगार आमच्या मोबाइलमधून आमच्या बँक खात्याचा तपशील शोधतात आणि आमची रक्कम लंपास करतात. त्यामुळे यापुढे लक्षात ठेवा की, विविध ॲप आणि फ्री गेम डाउनलोड करताना तुम्ही सायबर गुन्हेगारांना तुमच्या अकाउंटमध्ये डोकावण्याची संधी देत आहात.
---
ही चूक करू नका!
नागपूरसह ठिकठिकाणी असे अनेक गुन्हे घडले आहेत. ना कुणाचा कॉल आला, ना कुणाला ओटीपी शेअर केला अन् तरीही बँकेतून रक्कम गायब झाली. हे सर्व स्मार्टफोनमधील अनोळखी ॲप आणि फ्री गेम डाउनलोड केल्यामुळेच झाल्याचे बहुतांश गुन्ह्याच्या तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तुम्ही ती चूक करू नका.
---
... तर रक्कम परत मिळते !
अशा कोणत्या गुन्ह्याची तुम्ही शिकार झाले असाल तर तातडीने पोलिसांच्या सायबर शाखेत धाव घ्या. तिथे तक्रार नोंदवा. जेवढ्या लवकर तक्रार नोंदविली तेवढी जास्त शक्यता रक्कम परत मिळण्याची असते. तुम्ही सायबर शाखेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तर हे अधिकारी लगेच संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधता. ज्या खात्यात रक्कम ट्रान्स्फर झाली, ते खाते तत्काळ फ्रिज करण्याचे आदेश देतात. त्यामुळे संबंधित गुन्हेगाराला ती रक्कम काढता येत नाही. त्यानंतर फ्रिज केलेल्या खात्यातून बँक अधिकारी पोलिसांच्या मदतीने आपली रक्कम परत करतात. मात्र, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया गुन्हा घडल्याच्या २४ तासांच्या आत झाली तरच ते शक्य होते.
---
५० लाखांची रोकड परत नागपुरात सायबर गुन्हेगारीत प्रचंड वाढ झाल्याचे लक्षात घेऊन गेल्या वर्षी येथे सायबर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. येथील बहुतांश पोलीस अधिकारी तज्ज्ञ आणि मदतीची भावना ठेवून वागणारे आहेत. हातचे काम बाजूला ठेवून पीडितांची रक्कम तातडीने परत कशी मिळवून देता येईल, यासाठी ते प्रयत्न करतात. गेल्या सहा महिन्यांत त्यांनी एका व्यापाऱ्यासह १२ पीडितांना त्यांची ५० लाखांची रक्कम परत मिळवून दिली आहे.
---
ही खबरदारी घ्या!
स्मार्टफोन वापरताना कोणतेही अनोळखी ॲप किंवा फ्री गेम डाउनलोड करू नका, तसेच त्यांना परमिशनही देऊ नका.
---
ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे
२०१९ : २७००
२०२० : ४२३४
२०२१ (मे पर्यंत) : ४५०
---
सतर्कता हाच उत्तम उपाय !
‘आपली खाजगी माहिती कुणाला उपलब्ध करून देऊ नये. कोणतीही लिंक डाउनलोड करू नये आणि कुणालाही ओटीपी शेअर करू नये. सतर्कता हाच सर्वात चांगला उपाय आहे, असे सायबर तज्ज्ञ म्हणतात.’
---