गांधीसागर तलावाच्या स्वच्छतेसाठी निश्चय फाऊंडेशनचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:08 IST2021-03-07T04:08:59+5:302021-03-07T04:08:59+5:30
नागपूर : शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या गांधीसागर तलावाच्या दैन्यावस्थेवर आणि अस्वच्छतेबद्दल कृती न करता केवळ चिंता व्यक्त करणाऱ्यांची कानउघाडणी ...

गांधीसागर तलावाच्या स्वच्छतेसाठी निश्चय फाऊंडेशनचा पुढाकार
नागपूर : शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या गांधीसागर तलावाच्या दैन्यावस्थेवर आणि अस्वच्छतेबद्दल कृती न करता केवळ चिंता व्यक्त करणाऱ्यांची कानउघाडणी केल्यानंतर निश्चय फाऊंडेशने शनिवारी या कार्यासाठी पुढाकार घेतला. परिसरातील आणि शहरातील नागरिकांच्या सहकार्याने या तलावातील कचरा काढण्याचे आणि स्वच्छतेचे काम करण्यात आले.
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या आणि शहराच्या गतवैभवाची साक्ष देणाऱ्या या तलावाची अलीकडे मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झाली आहे. महानगरपालिका आणि अन्य एजन्सीकडे येथील स्वच्छतेचे काम आहे. मात्र बऱ्याच उणिवा आहेत. या पार्श्वभूमीवर काही नागिरकांनी निव्वळ दुर्दशा मांडणारे आणि स्वच्छतेचे आवाहन करणारे फलक या परिसरात लावले होते. दरम्यानच्या काळात तलावाच्या दुरवस्थेबद्दल जनहित याचिकाही दाखल झाली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी करताना बॅनर लावून निव्वळ आवाहन करणाऱ्यांना सुनावले. प्रशासन त्यांच्या पद्धतीने सफाई करतेच, पण नागरिकांचेही कर्तव्य आहे. प्रशासनावर टीका करणे, आक्षेप घेणे सोपे आहे. त्यांच्यासोबत स्वच्छतेत नागिरकांचेही योगदान हवे, असे झाले तर ५० टक्के समस्या मिटतील, असे मत नोंदविले होते.
न्यायालयाच्या या कानउघाडणीनंतर निश्चय फाऊंडेशनने स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला. ३ मार्चला आवाहन केले. त्यानंतर शनिवारी नागरिकांच्या सहकार्याने तलावाची स्वच्छता केली. यात नागरिक, युवक सहभागी झाले होते.