ना मनुष्यबळ ना मनी पॉवर पण जबाबदारी सर्वांच्या सुरक्षेची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:07 IST2021-01-04T04:07:59+5:302021-01-04T04:07:59+5:30
राजीव सिंह लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहरातील ३० लाख लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी महापालिकेच्या अग्निशमन विभागातील १९० अधिकारी ...

ना मनुष्यबळ ना मनी पॉवर पण जबाबदारी सर्वांच्या सुरक्षेची
राजीव सिंह
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरातील ३० लाख लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी महापालिकेच्या अग्निशमन विभागातील १९० अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आहे. म्हणजेच १५ हजार ७९० लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी अग्निशमन विभागाच्या एका कर्मचाऱ्यावर आहे. सोबतच ग्रामीण भागात आगीची घटना घडल्यास मनपाच्या अग्निशमन विभागाला गाडी पाठवावी लागते.
अग्निशमन विभागात यंत्रसामुग्री व वाहनांची कमी नाही. ती चालविण्यासाठी मनुष्यबळ नसल्याने अग्निशमन विभागाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. या विभागाला सक्षम करण्यासाठी अर्थसंकल्पातही नाममात्र तरतूद केली जाते.
सात वर्षात मनपा अर्थसंकल्पात अग्निशमन विभागासाठी एकूण अर्थसंकल्पाच्या १.१२ टक्के ते १.४० टक्के इतकी तरतूद करण्यात आली. तरतुदीनंतरही ही रक्कम खर्च होत नाही. मागील तीन वर्षात ३० ते ३५ टक्के रक्कम खर्च झाली. एकूणच मनुष्यबळाच्या कमतरतेसोबतच विभागाला आर्थिक तंगीचाही सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत हा विभाग लोकांचा जीव, मालमत्ता वाचविण्यात मागे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा विचार करता विभागाला सक्षम करण्याची गरज आहे. विभागातील ७७ टक्क्याहून अधिक पदे रिक्त आहेत.