महात्मा फुलेंच्या विज्ञाननिष्ठ विचारांची गरज

By Admin | Updated: June 24, 2014 00:54 IST2014-06-24T00:54:38+5:302014-06-24T00:54:38+5:30

महात्मा जोतिबा फुले यांचे साहित्य हे मानवतावादी व विज्ञाननिष्ठ असून त्यांचे विचार तळागाळापर्यंत पेरण्याची गरज आहे. फुले यांनी केवळ दलितांसाठीच नव्हे तर ब्राह्मण विधवांच्या अस्तित्वासाठीही जीवाचे

The need for the scientific thinking of Mahatma Phule | महात्मा फुलेंच्या विज्ञाननिष्ठ विचारांची गरज

महात्मा फुलेंच्या विज्ञाननिष्ठ विचारांची गरज

मा. म. देशमुख यांचे प्रतिपादन : मोर्शी येथे राज्यस्तरीय सत्यशोधक साहित्य संमेलन
अमरावती : महात्मा जोतिबा फुले यांचे साहित्य हे मानवतावादी व विज्ञाननिष्ठ असून त्यांचे विचार तळागाळापर्यंत पेरण्याची गरज आहे. फुले यांनी केवळ दलितांसाठीच नव्हे तर ब्राह्मण विधवांच्या अस्तित्वासाठीही जीवाचे रान केले, असे प्रतिपादन प्रसिध्द विचारवंत मा.म. देशमुख यांनी केले.
उपेक्षित समाज महासंंघ व अ.भा. माळी महासंघाच्यावतीने मोर्शी येथील मडघे मंगल कार्यालयात आयोजित चवथ्या राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष मोहन मडघे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर वैशाली धाकुलकर यांनी महात्मा फुलेंच्या अखंडाचे तर उत्तमराव भैसने यांनी संत गाडगेबाबा यांचे प्रबोधनपर गीत सादर केले. अध्यक्षस्थानी नागपूर येथील फुलेवादी विचारवंत मा.म. देशमुख होते. लेखिका रजिया सुलताना, लोकसाहित्याच्या अभ्यासक निर्मला गोरडे प्रामुख्याने उपस्थित होत्या. व्यासपीठावर प्रेम सातपुते, संतोष हुशे, मनोहर आंडे, अखिल भारतीय माळी महासंघाचे शहराध्यक्ष प्रवीण ढवळे, बबन पाटील, गणेश खारकर, श्रीधर पाचघरे, भाऊसाहेब पेठे, प्राचार्य चंदनकर, दिलीपसिंग गिरासे, केशव कांडलकर, जीवन कडू, श्रीकृष्ण माहोरे, कमलाकर घोंगडे, प्रवीण बनसोेड, महेंद्र मेटे, सुशीला मडघे, दीपक खवले, प्राचार्य रामराव वानखडे, नीळकंठ यावलकर, राजेंद्र आंडे, दिलीप लोखंडे, गिरीश खारकर आदी उपस्थित होते.
‘महात्मा फुले आणि सध्याच्या शिक्षण व्यवस्थेची दिशा’, ‘महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि आजच्या महिलांची मानसिकता’, ‘महात्मा फुलेंच्या क्रांतिकार्यामागील प्रेरणा’, ‘महात्मा फुले व सावित्रीबाई फुलेंच्या साहित्यातील मानवतावाद’, ‘सत्यशोधक समाज चळवळीची गरज’ आदी विषयांवरील परिसंवादातून विचारवंतांनी अभ्यासपूर्ण विचार मांडले.
परिवर्तनवादी कविसंमेलनात २० कवींनी कविता सादर केल्यात. फुले यांच्या जन्मदिनी (११ एप्रिल रोजी) राष्ट्रीय उत्सव जाहीर करून सार्वजनिक सुटी जाहीर करण्याची एकमुखी मागणी करण्यात आली. याप्रसंगी मनोहर आंडे यांनी पाचवे राज्यस्तरीय महात्मा फुले साहित्य संमेलन वरूड येथे घेण्याचा निर्धार व्यक्त केला. आभार राजेंद्र मेहरे यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: The need for the scientific thinking of Mahatma Phule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.