बांगला संस्कृती नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज
By Admin | Updated: June 27, 2015 03:18 IST2015-06-27T03:18:34+5:302015-06-27T03:18:34+5:30
महाराष्ट्र आणि बंगाल हे दोन्ही राज्य असे आहेत जिथे कला, साहित्य, शिल्प आणि संगीत यांच्यात उल्लेखनीय प्रगती झाली आहे.

बांगला संस्कृती नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज
जागतिक बांगला संमेलनाला सुरुवात : नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
नागपूर : महाराष्ट्र आणि बंगाल हे दोन्ही राज्य असे आहेत जिथे कला, साहित्य, शिल्प आणि संगीत यांच्यात उल्लेखनीय प्रगती झाली आहे. आजही साहित्य, कला आणि सस्कृतीच्या प्रगतीसाठी दोन्ही राज्यात अनुकूल वातावरण आहे. दोन्ही राज्यांकडे साहित्य, कला व संगीताचा समृद्ध वारसा असून नवीन पिढीपर्यंत तो पोहोचविण्याची गरज आहे. कारण राष्ट्राची निर्मिती करायची असेल तर संस्कृतीप्रति तरुणांना जागरूक करावे लागेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित जागतिक बांगला संमेलनाचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्रिपुऱ्याचे राज्यपाल तथागत रॉय, बांगलादेशचे उच्चायुक्त सय्यद मुअज्जिम अली, सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश विकास सिरपूरकर, गोदावरी फाऊंडेशन जळगावचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, विश्व भारती विद्यापीठ शांतिनिकेतन(पश्चिम बंगाल)चे कुलगुरू डॉ. सुशांत दत्तगुप्ता, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, आ. अनिल सोले प्रमुख अतिथी होते. कार्यक्रमाच्या सुुरुवातीला प्रसिद्ध बांगला गायक सूरमणी पं. शंकर भट्टाचार्य यांनी मंगल गायन केले. यानंतर स्वागतगीत सादर करण्यात आले. शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जागतिक बांगला संमेलनावर विशेष स्मरणिका ‘बंग-विहंग’ प्रकाशित करण्यात आली.
संचालन संमेलनाच्या महासचिव लीली मुखर्जी, पिनाकी बॅनर्जी यांनी केले. बिबेक कुमार मुखर्जी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
कला-साहित्य क्षेत्रातील प्रसिद्ध मान्यवरांचा सत्कार
बंगाली साहित्य, कला व संस्कृतीचा प्रचार, प्रसार करण्यास ज्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले अशा प्रसिद्ध मान्यवरांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. यात बांगला साहित्यिक, नाटककार, गीतकार व लेखक मणिशंकर मुखोपाध्याय, मूक अभिनयाद्वारे भावनांच्या अभिव्यक्तीला कलेचे रूप देऊन जगभरात सादरीकरण करणारे जोगेश दत्त, आॅलिम्पिकमध्ये खेळणारे प्रसिद्ध फुटबॉलपटू चुनी गोस्वामी तसेच बंगालमध्ये प्रसिद्ध असलेले मराठी लेखक महेश एलकुंचवार, बांगला आणि मराठी साहित्यात सेतूचे काम करणाऱ्या मृणालिनी केळकर, राम म्हैसाळकर आणि जागतिक बांगला संमेलनाचे संस्थापक सदस्य डॉ. अजय मुखर्जी यांना सन्मानित करण्यात आले.
आज दोन सत्रात विविध कार्यक्रम
जागतिक बांगला संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी ९.३० वाजता पहिले सत्र सुरू होईल. यात बंगाली समाजातील विचारवंतांचे चर्चासत्र होईल. वाजता सुमंत्रा सेन गुप्ता यांचा पाठ, १२ वाजता गायन, १ वाजता प्रसिद्ध कलावंत जोगेश दत्ता यांचे मूक सादरीकरण, सायंकाळच्या सत्रात ईरा मुखर्जी यांचे गायन, ७.३० वाजता ऋषी बॅनर्जी यांचे गायन, ८.१५ वाजता नृत्य नाटक होईल.