शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्नांची गरज
By Admin | Updated: February 15, 2015 02:30 IST2015-02-15T02:30:38+5:302015-02-15T02:30:38+5:30
विज्ञान क्षेत्रात दैनंदिन होणारे बदल भारतीय शिक्षण पद्धतीशी जोडून ग्रामीण भागात शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्नांची गरज
नागपूर : विज्ञान क्षेत्रात दैनंदिन होणारे बदल भारतीय शिक्षण पद्धतीशी जोडून ग्रामीण भागात शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
त्रिमूर्तिनगरतील भारतीय विद्या भवन्सच्या भगवानदास पुरोहित विद्या मंदिरच्या चौथ्या शाळेच्या इमारतीचे उद््घाटन शुक्रवारी फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय विद्या भवन्स नागपूर केंद्राचे अध्यक्ष व माजी खासदार बनवारीलाल पुरोहित होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अजय संचेती, महापौर प्रवीण दटके, आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, आशिष देशमुख, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्याम वर्धने, डॉ. सुनंदा सोनारीकर, राजेंद्र पुरोहित, राकेश पुरोहित उपस्थित होते.
ग्रामीण भागात शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू असून, या क्षेत्रात शिक्षक आणि शिक्षण संस्थांचाही सहभाग मोलाचा ठरतो, असे फडणवीस म्हणाले. शिक्षण क्षेत्रातील भारतीय विद्या भवन्सची कामगिरी मोलाची असल्याचे ते म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, कोराडी-खापरखेडा या भागातून मोठ्या प्रमाणात मुले शिक्षणासाठी नागपुरात येतात. त्यांच्यासाठी कोराडी कॉलनीतील दहा एकर जागेत भवन्सने शाळा सुरू करावी.
बनवारीलाल पुरोहित यांनी संस्थेबाबत माहिती दिली. प्राचीन आणि आधुनिक संस्कृतीची सांगड घालून युवापिढीला गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश असून, शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचे काम संस्थेतर्फे केले जात आहे, असे बनवारीलाल पुरोहित म्हणाले.
सुरुवातीला फडणवीस यांच्या हस्ते नव्या इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण झाले. यावेळी त्यांच्या हस्ते मोहन सालोडकर, प्रखर गुप्ता आणि कौस्तुभ व्यास या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि इमारत उभारणीत योगदान देणारे अविनाश डोंगरे, दिलीप म्हसे, विनयकुमार जैन व रेणुका मोहरील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन संगीता बत्रा यांनी केले.
प्रो. क्यू.एच. जीवाजी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला व्ही.व्ही. भास्करन, डॉ. रूपा कुळकर्णी यांच्यासह शहरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.(प्रतिनिधी)