जिल्हा बँकेसाठी राष्ट्रवादीचे आंदोलन
By Admin | Updated: June 16, 2015 02:46 IST2015-06-16T02:46:36+5:302015-06-16T02:46:36+5:30
जिल्हा मध्यवर्ती बँक बंद पडली आहे. खरीप हंगाम सुरू होऊनही ती सुरू न झाल्याने शेतकऱ्यांच्या संकटात अधिक भर

जिल्हा बँकेसाठी राष्ट्रवादीचे आंदोलन
नागपूर : जिल्हा मध्यवर्ती बँक बंद पडली आहे. खरीप हंगाम सुरू होऊनही ती सुरू न झाल्याने शेतकऱ्यांच्या संकटात अधिक भर पडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केली. या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने १६ जून रोजी संविधान चौकात दुपारी १२ ते ४ या वेळात धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
अनिल देशमुख यांनी सांगितले की, जिल्हा बँकेचे व्यवहार सुरू करण्यास परवानगी मिळाल्यास २५० कोटी रुपयांचे पीक कर्ज खरीप हंगामाकरिता वाटपाचा बँकेचा मानस होता. परंतु बँकेचे व्यवहार सुरू करण्याची परवानगी न मिळाल्याने आता शेतकऱ्यांना कर्जवाटप होऊ शकणार नाही. यामुळे नागपूर जिल्ह्यातील शेतकरी कर्जापासून वंचित आहेत. कर्जाची परतफेड करणाऱ्यांना मागील वर्षी कर्ज मिळालेच नाही. यावर्षीही मिळणार की नाही हे अद्यापही सांगणे कठीण आहे. राष्ट्रीयकृत बँकेचे वाटप शेतकऱ्यांना सुरू असले तरी त्यांची पद्धत जटील असल्याने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येते आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या नागपूरचेच असल्याने त्यांनी याकडे स्वत: लक्ष देऊन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लवकरात लवकर सुरू होण्यासाठी जे काही पैसे लागतात ते सरकारने भरावे व शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी केली.
पत्रपरिषदेला आ. प्रकाश गजभिये, माजी आमदार दीनानाथ पडोळे, नगरसेवक राजू नागुलवार, बंडोपंत उमरकर, सतीश शिंदे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)