नक्षलवादी पहाडसिंग आत्मसमर्पणाच्या तयारीत
By Admin | Updated: July 3, 2014 00:52 IST2014-07-03T00:52:16+5:302014-07-03T00:52:16+5:30
एकेकाळी नक्षल चळवळीत कुख्यात असलेला उत्तर गडचिरोली व गोंदिया डिव्हीजनचा डिव्हीजनल कमांडर कुमारसाय कतलामी ऊर्फ पहाडसिंग आता चळवळीत एकाकी पडला आहे. त्याच्याबद्दल अविश्वास

नक्षलवादी पहाडसिंग आत्मसमर्पणाच्या तयारीत
नक्षल चळवळीला बसणार तडाखा : अंगरक्षक संदीपने दिली पोलिसांना माहिती
गडचिरोली : एकेकाळी नक्षल चळवळीत कुख्यात असलेला उत्तर गडचिरोली व गोंदिया डिव्हीजनचा डिव्हीजनल कमांडर कुमारसाय कतलामी ऊर्फ पहाडसिंग आता चळवळीत एकाकी पडला आहे. त्याच्याबद्दल अविश्वास निर्माण झाला असून त्याचे सहकारीच त्याच्यापासून दूर जात आहेत. त्यामुळे हतबल झालेला पहाडसिंग पोलिसांकडे आत्मसमर्पण करू शकतो, असा विश्वास त्याचा अंगरक्षक म्हणून काम केलेल्या संदीप ऊर्फ महेंद्र्र केरामे (रा. खुनेरा, जि. राजनांदगाव) याने व्यक्त केला.
संदीपने नुकतेच राजनांदगाव (छत्तीसगड) पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. पहाडसिंग २००३ मध्ये नक्षल चळवळीत ओढल्या गेला. त्याची पत्नी शकुनबाई ही छत्तीसगडमध्ये असलेल्या राजनांदगाव जिल्ह्यातील फाफामार येथे २००० ते २००३ मध्ये गावची सरपंच होती. आपल्या कामासोबतच पहाडसिंग तिला गावचा कारभार चालविण्यात मदत करीत असे. मात्र २००३ मध्ये गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला संरक्षण भिंत बांधण्याच्या कामावरून गावकरी आणि पहाडसिंग यांच्यात वाद झाला. शाळेला संरक्षण भिंत बांधण्याचा पक्का निर्धार शकूनबाई आणि पहाडसिंगने केला. मात्र इतर सदस्यांनी त्याला विरोध केला. अखेर गावकऱ्यांंनी शकूनबाईच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. यावेळी पहाडसिंगचा विश्वासू मित्र दयाशंकर यानेसुध्दा शकूनबाईच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे नैराश्यातून पहाडसिंगने २००३ मध्ये देवरी नक्षल दलममध्ये प्रवेश केला.
आपल्या चळवळीचा विस्तार करण्यासाठी त्याने अनेक तरुण तरुणींना या हिंसक चळवळीत ओढले. एकदा चळवळीत प्रवेश केल्यानंतर आता पोलीस तुम्हाला सोडणार नाही. चळवळ सोडून गेले तर पोलीस मारून टाकतील, अशी भीती दाखविली. मलाही सामान पोहोचविण्याच्या उद्देशाने नक्षली जंगलात घेऊन गेले. सुरूवातीला कुरखेडा, कोरची आणि खोब्रामेंढा (३ के) येथे दलम सदस्य म्हणून काम केले. चळवळीत असताना तीन-चार वेळा पोलिसांसोबत चकमकसुध्दा झाली. त्यानंतर संदीपकडे पहाडसिंगचा अंगरक्षक म्हणून काम सोपविण्यात आले.
या दरम्यान शीला ऊर्फ लता गोटा (रा. कोरची, जि. गडचिरोली) सोबत दलममध्ये ओळख झाली. आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर चळवळीतून आमच्या लग्नाला विरोध होऊ लागला. मात्र सहकाऱ्यांचा विरोध झुगारून खुद्द पहाडसिंगनेच गडचिरोलीच्या गांगीन जंगलात आमचे लग्न लावून दिले. एवढेच नव्हे तर आम्हाला मूल पाहिजे असल्यामुळे पहाडसिंगनेच आम्हाला आत्मसमर्पण करण्याचा सल्ला दिला. यापूर्वीसुध्दा आपल्या मुलींनी शिकून सवरून डॉक्टर व्हावे, अशी इच्छा त्याने व्यक्त केली होती.
आपल्या मुलींचा शैक्षणिक विकास असो की आपल्या अंगरक्षकाचे लग्न लावून देऊन अपत्य प्राप्तीसाठी त्यांना आत्मसमपर्णाचा सल्ला देणे, अशा कारणांवरून चळवळीत तो एकाकी पडू लागला आहे, असे संदीप सांगत होता. त्यातच चळवळीत केवळ आंध्र प्रदेशातील लोकांचेच वर्चस्व असून मोठमोठी पदेसुध्दा त्यांच्याकडे आहेत. चळवळीत युवतींना जबरदस्तीने सहभागी करून त्यांचे लैंगिक शोषण करणे ही नित्याचीच बाब झाली आहे. तसेच जबरीने नसबंदी होत असल्यामुळे चळवळीतील युवक-युवतींमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे चळवळीतील नक्षल्यांचा आत्मसमपर्णाकडे ओढा वाढला आहे.
पहाडसिंग आता वृध्दत्वाकडे झुकला असल्यामुळे त्याची चळवळीतील उपयोगितासुध्दा संपली आहे. त्याने चळवळीत ज्यांना मोठे केले तेच आता त्याच्यावर सूड उगारत असल्यामुळे तो पुरता हतबल झाला आहे. त्यामुळे तो आत्मसमर्पण करू शकतो. पहाडसिंगनेही आत्मसमर्पण करून आमच्यासारखे सुखी जीवन जगावे, याचा मला नक्कीच आनंद होईल, असे शेवटी संदीप म्हणाला. (जिल्हा प्रतिनिधी)