झारखंडमधील नक्षल्यांनी केलेल्या स्फोटाचे हादरे देशभरातील रेल्वे ट्रॅकला; नागपूरसह सर्वत्र अलर्ट

By नरेश डोंगरे | Published: December 22, 2023 11:51 PM2023-12-22T23:51:46+5:302023-12-22T23:52:09+5:30

- घटनेच्या काही मिनिटांपूर्वी निघाली तेथून नागपूरकडे येणारी एक्सप्रेस - ज्ञानेश्वरी एक्सप्रेसच्या भीषण अपघाताच्या आठवणी ताज्या

Naxal blasts in Jharkhand rock railway tracks across the country; Alert everywhere including Nagpur | झारखंडमधील नक्षल्यांनी केलेल्या स्फोटाचे हादरे देशभरातील रेल्वे ट्रॅकला; नागपूरसह सर्वत्र अलर्ट

झारखंडमधील नक्षल्यांनी केलेल्या स्फोटाचे हादरे देशभरातील रेल्वे ट्रॅकला; नागपूरसह सर्वत्र अलर्ट

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: गुरुवारी रात्री झारखंडमधील डेरंवा - पाैसेता रेल्वे स्थानकादरम्यानच्या ट्रॅकला नक्षलवाद्यांनी भीषण स्फोट घडवून उडवून दिले. या घटनेच्या काही मिनिटांपूर्वीच नागपूरकडे येणारी टाटा-ईतवरी एक्सप्रेस घटनास्थळावरून निघाली होती, हे विशेष!

दरम्यान, या नक्षलवादी हल्ल्याचे हादरे देशभरातील रेल्वे ट्रॅकला बसले असून, खबरदारीचा उपायय म्हणून रेल्वे सुरक्षा दलाला अलर्ट देण्यात आला आहे. या सोबतच १३ वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यात घडलेल्या ज्ञानेश्वरी एक्सप्रेसच्या भीषण अपघाताच्या आठवणीही रेल्वे प्रशासन आणि प्रवाशांच्या मनात ताज्या झाल्या आहेत.

पश्चिम बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातून धावणाऱ्या ज्ञानेश्वरी एक्सप्रेसचा २८ मे २०१० ला भीषण अपघात झाला होता. नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून रेल्वे ट्रॅक काढून घेतल्याने हा अपघात झाल्याची त्यावेळी चर्चा होती.

हावडा-कुर्ला लोकमान्य टिळक ज्ञानेश्वरी सुपर एक्सप्रेस हावडा ते मुंबई असा प्रवास करत होती. ती रुळावरून घसरल्यानंतर या गाडीने विरुद्ध दिशेने धावणाऱ्या मालगाडीला जोरदार धडक दिली होती. त्यावेळी १४८ लोकांचा मृत्यू झाला तर पावणेदोनशेहून जास्त प्रवासी जखमी झाले होते. या अपघातानंतर तीन डझनावर प्रवासी बेपत्ता झाले होते. त्यातील २४ प्रवाशांचा नंतर पत्ताच लागला नव्हता. आता या अपघाताला १३ वर्षे झाली. मात्र, या अपघाताच्या आठवणी आल्यास रेल्वे प्रशासन आणि रेल्वे प्रवासी अजूनही शहारतात.

गुरुवारी पहाटे झारखंडमधील रेल्वे ट्रॅकवर स्फोट घडवून नक्षलवाद्यांनी थर्ड रेल्वे लाईन उडवून दिल्याचे वृत्त सर्वत्र पसरले अन् त्यानंतर त्या भागात धावणाऱ्या रेल्वे गाड्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नातेवाईकांच्या काळजाची धडधड सुरू झाली. कारण नागपूर विदर्भातून झारखंडमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. येथून ईतवारी (नागपूर) स्थानकावरून टाटानगरसाठी आणि टाटानगरमधून नागपूर ईतवारी साठी रोज ट्रेन धावते. २४ तास या प्रवासाला लागतात.
विशेष उल्लेखनीय म्हणजे, ही घटना घडली त्याच्या अगदी काही मिनिटांपूर्वी टाटा-ईतवारी एक्सप्रेस घटनास्थळावरून नागपूरकडे येण्यासाठी निघाली होती. सुत्रांच्या माहितीनुसार, स्फोट घडविण्यापूर्वी नक्षल्यांनी डेरंवा स्थानकाजवळ एक बॅनर लावले होते. टाटा ईतवारी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये फसले आणि त्याच अवस्थेत रेल्वेगाडी नागपूरकडे निघाले.

नक्षल्यांचा रेल्वे ट्रॅकवरील राग

नक्षलवाद्यांचा रेल्वे ट्रॅकवरील राग तसा जुनाच आहे. गेल्या वर्षी, जानेवारी २०२२ मध्ये अशाच प्रकारे झारखंडमधील गिरिडीहजवळ मध्यरात्री नक्षलवाद्यांनी बॉम्बस्फोट करून रेल्वे ट्रॅक उडवून दिला होता. त्याअगोदर काही वर्षांपूर्वी ओरिसातील सुंदरगड जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सुरुंग स्फोट करून राऊरकेलाकडे जाणारे रेल्वेरुळ उखडून टाकले होते.

आम्ही खबरदारी घेत आहोत

या स्फोटानंतर सर्वत्र अलर्ट आला असून, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व खबरदारी आम्ही घेत आहोत, अशी माहितीवजा प्रतिक्रिया रेल्वे सुरक्षा दलाचे आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी लोकमतशी बोलताना दिली.

Web Title: Naxal blasts in Jharkhand rock railway tracks across the country; Alert everywhere including Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.