संविधान राष्ट्रीय एकात्मता बंधुत्वाचा राष्ट्रगं्रंथ
By Admin | Updated: November 27, 2015 03:16 IST2015-11-27T03:16:26+5:302015-11-27T03:16:26+5:30
भारतीय संविधानाची मूलभूत तत्त्वे, स्वतंत्र भारताच्या प्रत्येक नागरिकास संस्कारित करणारी आहेत.

संविधान राष्ट्रीय एकात्मता बंधुत्वाचा राष्ट्रगं्रंथ
भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई : संविधानाच्या उद्देशिका शिलालेखाचे लोकार्पण
नागपूर : भारतीय संविधानाची मूलभूत तत्त्वे, स्वतंत्र भारताच्या प्रत्येक नागरिकास संस्कारित करणारी आहेत. एकूणच भारतीय संविधान प्रत्येकाच्या प्रतिष्ठापूर्वक जगण्याशी व विकसित अस्तित्वाशी निगडित आहे. संविधान हे राष्ट्रीय एकात्मता ,बंधुत्व व देशाच्या संपन्नतेचा राष्ट्रगं्रंथ असल्याचे मनोगत डॉ. बाबासाहेब आंबेकडर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी गुरुवारी व्यक्त केले.
महापालिकेतर्फे उत्तर नागपुरातील बेझनबाग येथील हर्षवर्धन बौद्ध विहारच्या पटांगणावर उभारण्यात आलेल्या १५ फूट उंचीच्या भव्य स्तंभावरील भारतीय राज्य घटनेच्या उद्देशिकेची नोंद असलेल्या शिलालेखाचे लोकार्पण भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, महापौर प्रवीण दटके, आमदार अनिल सोले, सुधाकर देशमुख, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, आयुक्त श्रावण हर्डीकर, बसपा नेते गौतम पाटील, सभापती सुनील अग्रवाल, संदीप जाधव व राजू थूल आदी उपस्थित होते.
संविधानाच्या आधारे देश चालतो. न्यायपालिकेची कार्यप्रणाली, विधिमंडळाचा कारभार चालतो. संविधानामुळेच देशाची एकात्मता व अखंडता टिकून आहे. अशा संविधानाचा सन्मान करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. संविधानाविषयी जनजागृती व संविधानाची सर्वांना ओळख व्हावी. या हेतूने महापालिकेतर्फे हा शिलालेख उभारण्यात आला आहे. संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाच्या पर्वावर या शिलालेखाचे लोकार्पण करण्यात आले. प्रारंभी भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. तसेच बुद्ध प्रतिमेला पुष्प वाहून बुद्धवंदना घेतली. यावेळी भन्ते नागघोष यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे उपस्थिताकडून वाचन करून घेतले.
यावेळी बब्बी बावा, मनोहर थूल, प्रभाकर येवले, कार्यकारी अभियंता दिलीप जामगडे, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर,अविनाश धमगाये, सरला बोरकर, बबली मेश्राम, विक्की कुकरेजा, रमेश वानखेडे, शालू मडके, अनिता मडके, रिता बर्मन यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)